ब्रेकिंग : जागावाटपाची घोषणा होताच महाआघाडीत फूट

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राजकीय पक्षांकडून आघाडी जुळवण्याचे गणित सुरू असताना बनलेल्या आघाडीमध्ये फूट पडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
 Vikassheel Insaan Party breaks alliance with mahagathbandhan in bihar
Vikassheel Insaan Party breaks alliance with mahagathbandhan in bihar

नवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र दिसत आहे. महाआघाडीतील आरजेडी, काँग्रेस आणि डावे पक्ष यांचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच क्षणी महाआघाडीत फूट पडली आहे.

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे बिहारमधील विधानसभा निवडणूक या वेळी राजकीय पक्षांच्या व्हर्च्युअल प्रचारामुळे गाजणार आहे. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबरला असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  

यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीवेळी सहकारी असलेले पक्ष आता विरोधात मैदानात आहेत. मागील वेळी लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जेडीयू आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र होते. त्यावेळी भाजपने लोकजनशक्ती पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्षासोबत आघाडी केली होती. मागील निवडणुकीच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए)  विजय झाला होता. या विजयानंतर काही महिन्यांमध्येच नितीश यांनी लालूंच्या पक्षाची साथ सोडत भाजपसोबत आघाडी केली होती. यामुळे विरोधी बाकांवरील भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष सत्तेत आला होता. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. आधी या महाआघाडीचे घटक असलेले जितनराम मांझी आता एनडीएमध्ये गेले आहेत. याचवेळी एनडीएमधील लोक जनशक्ती पक्षाने वाढीव जागा मिळाव्यात म्हणून आग्रह धरला आहे. लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी जास्त जागा मिळाव्यात म्हणून आग्रही भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे एनडीएचे जागावाटप लांबत चालले आहे. 

आता काँग्रेस आणि आरजेडी यांच्यातही जागा वाटपावरुन तिढा निर्माण झाला होता. अखेर हा तिढा सुटला आहे. आरजेडीला सर्वाधिक 144 जागा मिळाल्या आहेत. त्याखालोखाल काँग्रेसला 70 जागा मिळाल्या आहेत. डाव्यां पक्षांमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 4, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 6 आणि मार्क्स आणि लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाला 19 जागा देण्यात आल्या आहेत. आरजेडीच्या कोट्यातून झारखंड मुक्ती मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांना जागा देण्यात येणार होत्या. 

जागावाटपाची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच क्षणी विकासशील इन्सान पार्टीने महाआघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. याबाबत पार्टीचे नेते मुकेश साहनी म्हणाले की, अतिमागास वर्गाच्या पाठीत आरजेडीने खंजीर खुपसला आहे. हाच अतिमागास वर्ग आता आरजेडीला निवडणुकीत योग्य उत्तर देईल. पक्षाची पुढील वाटचाल आणि आगामी निवडणुकीबाबत उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात येईल. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com