पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या संयुक्त जनता दलाची (जेडीयू) ताकद वाढवत आहेत. माजी केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी त्यांचा राष्ट्रीय लोक समता पक्ष नुकताच जेडीयूमध्ये विलीन केला होता. पक्ष विलीन केल्यानंतर तीनच दिवसांत त्यांना आमदारकीची लॉटरी लागली आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा सदस्यांमध्ये त्यांचा समावेश आहे.
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा जागा गेल्या मे महिन्यांपासून रिक्त आहेत. या सर्व जागा जेडीयूच्याच वाट्याच्या होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची ताकद वाढली आहे. यामुळे या जागांची वाटणी झाली असून, बारापैकी प्रत्येकी सहा-सहा जागांचे वाटप झाले. अखेर या बारा सदस्यांची नावे जाहीर झाली आहेत.
नितीशकुमार यांचे हात मजबूत करण्यासाठी आपला पक्ष जेडीयूत विलीन करणारे उपेंद्र कुशवाह यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. जेडीयू आणि भाजपच्या कोट्यातील आमदार नसलेल्या मंत्र्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देण्यात आले आहे. यात अशोक चौधरी आणि जनम चमार यांचा समावेश आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत पत्रकार देवेशकुमार यांना भाजप कोट्यातून संधी देण्यात आली आहे.
या यादीत केवळ एकाच महिलेला स्थान देण्यात आले असून, भाजपने निवेदिता सिंह यांना संधी दिली आहे. उपेंद्र कुशवाह यांना जेडीयूकडून राज्यसभेवर पाठवण्यात येईल, अशी शक्यता होती. परंतु त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली असून, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. मात्र, भाजपने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जागा कमी मिळूनही नितीशकुमार मुख्यमंत्री झाले. परंतु, जागा कमी झाल्याची खंत त्यांच्या सतावत आहे. त्यामुळेच भाजप आणि राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) तोंड देण्यासाठी पक्षाची ताकद वाढविण्याच्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
विधानसभा निवडणूकीत उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मात्र, त्यांचा मित्रपक्ष असलेल्या बहुजन समाज पक्षाचा एक उमेदवार जिंकला. त्या आमदाराने काही दिवसांतच जेडीयूमध्ये दाखल होत मंत्रिपदही मिळवले. त्यानंतर नितीशकुमार यांनी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांना धक्का दिला. पासवान यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना नितीशकुमार यांनी आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.
त्यानंतर आता नितीशकुमार यांनी कुशवाह यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. कुशवाह हे जेडीयूमध्ये होते. त्यांची आता घरवापसी झाली आहे. त्यांच्या येण्याने नितीश कुमारांची ताकद वाढली आहे. त्यामुळे कुशवाह यांना लगेच पक्षाच्या राष्ट्रीय संसदीय मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. राज्य आणि देशातील सध्याची स्थिती पाहून निर्णय घेतल्याचे कुशवाह यांनी पक्षाच्या विलीनीकरणानंतर सांगितले होते.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.