छत्रपतींची मराठी भाषा अन् महाराष्ट्र काय भिकारी नाही; उद्धव ठाकरेंनी केंद्राला ठणकावलं

विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असून, राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे.
udhhav thackeray slams central government over marathi language status
udhhav thackeray slams central government over marathi language status

मुंबई : विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाला आज उत्तर दिले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार फटकेबाजी करीत विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष केले. त्यांचा रोख हा प्रामुख्याने केंद्रातील भाजप सरकारवर होता. त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला धारेवर धरले. 

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, सर्वांनी काही ना काही विषय विधानसभेत मांडले आहेत. काहींनी प्रश्न विचारले आहेत. सर्वांची आताच उत्तर देणे शक्य होणार नाही .आपण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला आमच्याकडे उत्तर आहे. सगळे सदस्य बोलून गेले आहेत, त्यातील काही विचारणारे हजर राहिले असते तर बरे झाले असते. 

सीमा प्रश्नांवर बोलताना ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सीमाप्रश्नावर जे बोलले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आज मराहाष्ट्रासह कर्नाटक व्याप महाराष्ट्रातील मराठी  नागरिकही त्यांचे आभार मानत असतील. मराठी बांधवांवरील कानडीची सक्ती आपण सगळे मोडून काढू. चला आपण सगळे मिळून केंद्राकडे जाऊ आणि हा विषय मांडू. 

मराठी भाषा दिनानिमित्त अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले. आम्ही म्हणतो की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊ. आम्ही म्हणजे कोण? केंद्र सरकारने अजूनही मराठीला तिष्ठत ठेवले आहे. मराठी भाषा आणि हा महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय दिल्लीच्या दारात कटोर घेऊन उभे आहोत का? ही छत्रपतींची भाषा आहे. छत्रपती नसते तर दिल्लीत बसलेले असते का? ज्या भाषेपासून तुमचे अस्तित्व आहे तिला विसरु नका, असे ठाकरे यांनी नमूद केले. 

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना ठाकरे म्हणाले की, राज्यपालांचे भाषण आपण सर्वांनी ऐकले. राज्यपालांना या भाषणाबद्दल धन्यवाद. त्यांनी निष्पक्षपातीपणाने सरकारची कारकिर्द मांडली. त्यांनी वस्तुस्थिती सगळ्यांसमोर ठेवली. अपेक्षित नसताना झालेले चांगले काम त्यांनी माडले. ते चांगले बोलले आणि मराठीत बोलले. काहींना त्यांचे हे मुद्दे पटणार नाहीत. कारण सरकार चांगले काम करतेय हेच त्यांना पटत नाही. 

शिवभोजन थाळी पाच रुपयांत आपण दिली. सुधीरभाऊंनी ती थाळी कोण खाणार, असा प्रश्न उपस्थित केला. मी राष्ट्रपतींचे भाषण ऐकले. त्यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे उल्लेख केला होता. सरकारने 80 कोटी लोकांनी अतिरिक्च पाच किलो धान्य दिल्याचे म्हटले होते. मागील आठ महिन्यांत अतिरिक्त धान्य मिळालेले हे सगळे गरीब आता श्रीमंत झाले का?  गरीबांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी इंधन गॅस दरवाढ असे तुम्ही म्हणता. अहो सुधीरभाऊ, एक गोष्ट सांगतो की आम्ही भरलेली थाळी देतोय अन् रिकामी थाळी वाजवत नाही. भरलेली की रिकामी थाळी हा या सरकारचा फरक आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com