मुंबई : भाजपने बिहारमध्ये मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. केवळ बिहारमध्ये मोफत लस देता मग बाकी भारत काय पाकिस्तान, बांगलादेश की कझाकस्तान आहे, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. संपूर्ण देश चालवताना अशा प्रकारची घोषणा करणाऱ्यांना लाज वाटायला हवी, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेनेचा दसरा मेळावा आज स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक व प्रमुख नेते असे मोजकेच निमंत्रित मेळाव्याला उपस्थित होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
काही जणांनी तोंडात शेण भरून गोमूत्राच्या गुळण्या ठाकरे कुटुंबावर केल्या. त्यांना मी सांगतो की, त्यांनी आता ते गिळावे अन गप्प बसावे. कारण आमचे हात स्वच्छ आहेत. स्वत: शेण खायचे आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा अशी यांची पद्धत आहे, असा ठाकरे यांनी लगावला. ठाकरे यांचा रोख अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करणाऱ्या भाजप नेत्यांवर होता.
ठाकरे म्हणाले की, मध्यंतरी एक अभिनेत्याचा मृत्यू झाला. लगेच तो बिहारचा पुत्र झाला. यानंतर मुंबई पोलिसांना लक्ष्य करण्यात आले. राज्यात कायदा व सुव्यवस्था नाही. मुंबई पोलीस निक्कमे आहेत, अशी टीका करण्यात आली. महाराष्ट्रात सगळीकडे गांजाची शेतीची सुरू असल्यासारखे चित्र रंगवण्यात आले. बिहारचा पुत्राच्या मृत्यूत काही काळबेर असेल ते शोधून काढा. परंतु, त्याच्या नावाने गळे काढणारे महाराष्ट्रावर चिखलफेक करीत आहेत.
मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणण्यात आले. पंतप्रधानपदी 2014 मध्ये विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याचे वचन दिले होते. आता मुंबईला व्याकव्याप्त काश्मीर म्हणणे हा मोदींचाच अपमान आहे. कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. मुंबई जर पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर ते मोदींचेच अपयश आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क मैदानात होणारा शिवसेनेचा भव्यदिव्य दसरा मेळावा यावर्षी मात्र तेथे झाला नाही. याला कारण होते कोरोना महामारीचे. शिवसैनिक आतुरतेने दसरा मेळाव्याची वाट पाहत असतात. मात्र, यंदा तो सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून फक्त ५० जणांच्या उपस्थितीत झाला. हा मेळावा शिवाजी पार्क परिसरातीलच स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरक्षा उपाययोजना जाहीर केल्या होत्या. यात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होतो. त्यावेळी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर जमतात. एवढा मोठा जनसमुदाय जमल्यास सरकारनेच घालून दिलेल्या नियमांचा भंग होणार असल्याने हा मेळावा शिवाजी पार्कवर न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.