मुख्यमंत्री निवडीची धामधूम अन् त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या 'कमबॅक'ची चर्चा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी राजीनामा दिला आहे. नवीन मुख्यमंत्र्याच्या निवडीसाठी भाजप आमदारांची बैठक होणार आहे.
trivendra singh rawat may be choice for chief minister in uttarakhand
trivendra singh rawat may be choice for chief minister in uttarakhand

डेहराडून : उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री तिरथसिंह रावत (Tiath Singh Rawat) यांनी राजीनामा दिला आहे. त्रिवेंद्रसिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांच्यानंतर चार महिन्यांतच तिरथसिंह रावत यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले आहे. आता नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी भाजप (BJP) आमदारांची बैठक होणार असून, पुन्हा एकदा त्रिवेंदसिंह रावत यांचे 'कमबॅक' होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. 

उत्तराखंडमधील मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवण्यासाठी भाजपने  केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि भाजपचे प्रभारी दुष्यंतकुमार गौतम यांना पाठवले आहे. प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली आज नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी बैठक होणार आहे. या बैठकीला हजर राहण्याचा पक्षादेश सर्व आमदारांना बजावण्यात आला आहे. 

राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहेत. तोपर्यंत मुख्यमंत्री कोण नेमावा, असा तिढा नेतृत्वामसोर आहे. सुमारे अर्धा डझन आमदार मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. यात चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याचबरोबर सत्पाल महाराज, धनसिंह रावत आणि पुष्करसिंह धामी यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. 

पुढील वर्षी निवडणूक होणार असल्यामुळे भाजपला अंतर्गत गटबाजी परवडणारी नाही. त्यामुळे सर्वांना मान्य होईल, असा नेता मुख्यमंत्रिपदी नेमण्याचा प्रयत्न नेतृत्वाचा राहील. पुढील निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करेल, असा नेता मुख्यमंत्रिपदी नेमण्याचा भाजपचा कयास आहे. यामुळे चार वर्षे मुख्यमंत्री असलेले त्रिवेंद्रसिंह यांच्या नावाला पसंती दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

त्रिवेंद्रसिंह रावत यांनी चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी तिरथसिंह रावत यांची निवड झाली होती. पक्षांतर्गत नाराजीमुळे त्रिवेंद्रसिंह यांना पायउतार व्हावे लागले होते. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीपासून नारायणदत्त तिवारी वगळता एकाही मुख्यमंत्र्याला पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. याला त्रिवेंदसिंहही अपवाद ठरले नव्हते. त्यांना राज्यातील अपूर्ण कार्यकाळाची प्रथा मोडून काढण्यासाठी केवळ एक वर्षाचा कालावधी राहिला होता. आता तिरथसिंह रावत यांनीही राजीनामा दिल्याने नवीन मुख्यमंत्री नेमावा लागणार आहे. 

रावत यांच्या भवितव्याचा निर्णय निवडणूक आयोगाच्या हाती होता. निवडणूक आयोगाने मात्र, निवडणुका घेण्याबाबत सावध भूमिका घेतली होती. मार्च-एप्रिल महिन्यांत काही राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणूक आयोग टीकेचा धनी बनला होता. अनेक राज्यांत पोटनिवडणुका प्रलंबित आहेत. मात्र, कोरोना संकटाच्या काळात निवडणुका घेण्यास आयोग राजी नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com