दहावी-बारावीच्या परीक्षांचा गोंधळ संपला...राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

कोरोना संकटाच्या काळात विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा यासाठी अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्यात आला आहे. आता दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
ssc and hsc exams will be conducted offline says education minister varsha gaikwad
ssc and hsc exams will be conducted offline says education minister varsha gaikwad

मुंबई : विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा यासाठी दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्यात आला आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी एप्रिल - मे महिन्यात घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येतील,  अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा पॅटर्न बदलणे शक्य नाही. त्यामुळे या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येतील, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सर्वसाधारणपणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होतात. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा एप्रिल महिन्याच्या अखेरीस आणि मे महिन्याच्या सुरुवातीला होतील. कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे दहावीचा एक पेपर रद्द करण्यात आला होता. 

राज्यातील काही ठिकाणच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळांचे निर्जंतुकीकरण, शिक्षकांच्या आरटी-पीसीआर चाचण्या केल्यानंतरच त्यांना वर्ग घेऊ दिले जाणार आहेत. यामुळे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात एक विश्वासाचं नातं निर्माण होईल. नंतर टप्प्याटप्प्याने सगळ्या शाळा सुरू करायचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. 

खासगी शाळांनी अमाप शुल्क  वाढवले असून, त्यासंदर्भात उच्च न्यायालयात खटला प्रलंबित आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून पालकांना दिलासा मिळेल, असे गायकवाड यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. 

शाळेत उपस्थितीची अट रद्द करा  
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील काही जिल्ह्यांतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत असतानाही शिक्षकांना शाळेत ५० टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. त्याला शिक्षक संघटनांकडून विरोध होऊ लागला असून, टिचर्स डेमॉक्रॅटिक फ्रंटने शाळेत शिक्षकांची उपस्थिती रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. 

शाळांमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ५० टक्के उपस्थित राहण्याचे आदेश शिक्षण विभागाने २५ ऑक्‍टोबरला दिले होते. त्या अनुषंगाने राज्यातील खासगी अनुदानित-विनाअनुदानित सर्व प्रकारच्या संस्थांमध्ये नववी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षण देण्यासाठी २३ नोव्हेंबरपासून शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले; मात्र कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता पाहून प्रशासनाने २० नोव्हेंबरला मुंबईतील सर्व शाळा पुन्हा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 

शाळेत शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीबाबत शिक्षण विभागाने स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक शाळेत शिक्षकांना आठवड्यातून दोन-तीन दिवस सक्तीने बोलावले जात आहे. आम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत असताना शाळेत का जावे, असा सवाल शिक्षक संघटनांकडून विचारण्यात येत आहे. 

Edited Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com