सोनिया गांधींच्या एका फोनवर फिरली चक्रे...आघाडीसह लोकसभेची एक अन् राज्यसभेच्या दोन जागा

तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि द्रमुकमध्ये जागा वाटपावरुन सुरू असलेला वाद आता मिटला आहे.
sonia gandhi calls dmk chief m k stalin over alliance in tamil nadu
sonia gandhi calls dmk chief m k stalin over alliance in tamil nadu

चेन्नई : तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि द्रमुकमध्ये जागा वाटपावरुन सुरू असलेला वाद आता मिटला आहे. द्रमुकने काँग्रेसला 25 जागा देण्याचे मान्य केले आहे. दोन्ही पक्षांतील जागा वाटपाचा वाद काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांनी फोन केल्यानंतर सुटला आहे. याचबरोबर काँग्रेसला लोकसभेची एका जागा मिळाली असून, राज्यसभेच्या दोन जागा मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

द्रमुकने काँग्रेसला अतिशय कमी जागांचा प्रस्ताव दिला होता. जेमतेम 20 जागा देण्यावरच द्रमुक सहमत असल्याचे बोलले जात होते. यावर काँग्रेसची अंतर्गत बैठक नुकतीच झाली. या बैठकीत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के.एस.अळगिरी भावनिक झाले होते आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. द्रमुकने काँग्रेसला अतिशय कमी जागा दिल्या असून, हा प्रस्ताव स्वीकारल्यास राज्यातून काँग्रेस नाहीशी होईल. यामुळे पक्षाने द्रमुकशी जागा वाटप करण्यासाठी माझ्याऐवजी दुसरा नेता नेमावा, असेही अळगिरी यांनी बैठकीत पक्षाला बजावले होते.  

अळगिरींच्या भावनिक बोलण्यानंतर बैठकीत काँग्रेस नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची मागणी एकमुखाने केली होती. जागा वाटपावरुन दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली होती. ही नाराजी फार काळ टिकली नाही. काँग्रेस नेत्यांच्या नाराजीनाट्यानंतर द्रमुकने 25 जागा देण्यास मान्यता दिली आहे. याचबरोबर काँग्रेस नेते एच.वसंतकुमार यांच्या निधनानंतर रिक्त झालेली कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसच्याच वाट्याला आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रमुकसोबतचा जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी खुद्द काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी थेट द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांना फोन केला. या वेळी सोनियांनी भाजपला रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे, असे स्टॅलिन यांना सांगितले. या चर्चेत दोन्ही पक्षांतील आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असून, इतरही महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. यात दोन राज्यसभा जागांची मागणीही काँग्रेसने केली आहे. यातील एक जागा द्रमुकच्या कोट्यातील आणि एक जागा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असेल. 

मागील निवडणुकीत काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या पण केवळ 7 उमेदवार निवडून आले होते. राज्यात द्रमुक सत्तेपासून दूर राहण्यात हेही कारण असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा देण्यास द्रमुक उत्सुक नव्हते. त्यामुळे काँग्रेसमध्येही नाराजी होती. अखेर अंतिम जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

राज्यात सत्तेत असलेल्या अण्णाद्रमुकने या वेळी भाजपशी आघाडी केली आहे. मागील निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे लढले होते. पण एकही आमदार निवडून आला नव्हता. अण्णाद्रमुकशी आघाडी केल्यानंतर जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपने प्रयत्न केले. मात्र, केवळ 20 जागा आणि कन्याकुमारीची लोकसभेची एक जागा मिळविण्यात भाजपला यश आले. काँग्रेस भाजपपेक्षा पाच जागा जास्त मिळाल्या आहेत. 

Edited By Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com