पश्चिम बंगालमध्ये मतदानाला हिंसेचे गालबोट..मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे प्रकार

पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 30 जागांसाठी आज मतदान झाले.
some incidents of violence reported in west bengal assembly election first phase
some incidents of violence reported in west bengal assembly election first phase

कोलकता : पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी आज मतदान झाले. काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपने मतदानात अडथळे आणल्याचा आरोप एकमेकांवर केला आहे. मतदानाच्या टक्केवारीतील अनियमिततेवरून तृणमूलने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. 

आज बंगालमध्ये मतदानादरम्यान काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. पश्‍चिम मिदनापूरमधील भाजपचे उमेदवार समित दास यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर गोंधळ घातल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, मिदनापूर शहरात मतदान शांततेत सुरू होते. मात्र, ग्रामीण भागात काही ठिकाणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मतदानात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. काही मतदान केंद्रात घुसून मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न तृणमूलने केला. आम्ही निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करणार आहोत. 

मतदानाच्या टक्केवारीतील अनियमिततेचा गंभीर आरोप तृणमूलने केला आहे. याबाबत तृणमूलने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, कांठी दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजून 13 मिनिटांनी अनुक्रमे 18.47 व 18.95 टक्के मतदान होते. परंतु, चार मिनिटांनंतर म्हणजेच 9 वाजून 17 मिनिटांनी मतदानात घट होऊन ते अनुक्रमे 10.60  व 9.40 टक्क्यांपर्यंत खाली आले. 

राज्यसभेतील तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. मतदानातील या तफावतीने आयोगाच्या आकडेवारीवर शंका उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपने मतदान केंद्रांवर ताबा मिळविल्याचा आरोप तृणमूलने केला आहे. मतदान केंद्र प्रतिनिधीसाठी संबंधित व्यक्ती त्या मतदारसंघातील मतदार असण्याची अट रद्द करण्याची मागणीही तृणमूलने केली आहे. तृणमूलचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या दहा खासदारांच्या गटाने आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. सध्याच्या व्यवस्थेबद्दल त्यांनी तक्रार दाखल केली आहे. 

तृणमूलच्या आरोपांवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, तृणमूलला पराभव समोर दिसू लागल्याने त्यांच्याकडून आरोप करण्यात येत आहेत. ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्षावर दबाव आल्यानेच ते विनाकारण तक्रारी करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com