मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत काय घडले हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ''मात्र होय.....मा.शरद पवार यांना भेटलो. ....महाराष्ट्रातील व देशातील घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. कुणालाही चिंतेचे अथवा पोटदुखीचे कारण नाही,'' असे ट्वीट राऊत यांनी केल्याने या भेटीमागणी उत्सुकता वाढली आहे.
राऊत आज दुपारी पवार यांना मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेटले. भेटीनंतर काही मिनिटांतच त्यांनी ट्वीट करुन या भेटीची माहिती दिली. दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबियांनी राऊत यांना बदनामीकारक वक्तव्यांबाबत नोटीस दिली आहे. या भेटीमागे हे कारण आहे काय याचीही चर्चा सुरु आहे. दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांबरोबर झूमद्वारे बैठक झाली होती. यात काही आमदारांनी आपली कामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने त्यांच्या आमदारांची कामे होतात व आमची खोळंबतात, असा या आमदारांच्या तक्रारीचा सूर होता. आजच्या पवार -राऊत भेटीमागे ही पार्श्वभूमी आहे काय याबद्दलही चर्चा होते आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांविरुद्ध केलेल्या वक्तव्यांबद्दल त्यांना सुशांतच्या चुलतभावाने कायदेशीर नोटीस बजावली आहे. राऊत यांनी आपण केलेल्या वक्तव्यांबद्दल येत्या ४८ तासांत माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या नोटिशीत म्हटले आहे. संजय राऊत यांनी 'सामना'च्या आपल्या 'रोखठोक' या सदरात सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की सुशांतच्या वडील के.के.सिंह यांनी दुसरे लग्न केलं होतं. सुशांत या लग्नाच्या विरोधात होता. यामुळेच सुशांत आणि त्यांच्या वडिलांचे संबध चांगले नव्हते. यावरुन त्यांच्यावर नोटीस बजावण्यात आली आहे.
सकाळी ही नोटीस बजावल्याचे वृत्त आल्यानंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. "सुशांतसिंह राजपूत प्रकरणाबाबत माफी मागण्याच्या विचार करेन, प्रसारमाध्यमांनी यात पडू नये," असे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले होते. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य आहे. इथं जनतेच्या हिताला प्राधान्य दिलं जातंय. सुशांतसिंह प्रकरणात राजकारन न करता, राज्य, देश कसा पुढे जाईल, याचा विचार आपण केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सुशांतसिंह प्रकरणामुळे राज्य सरकार अस्थिर असून ते पडेल का या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले होते की, सरकार अजिबात अस्थिर नसून ते पडणार नाही. जर असे झाले तर अगोदर केंद्र सरकार पडेल. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलिसच सक्षम आहेत. ते हा तपास पुढे नेतील. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुशांतसिंह प्रकरणाच्या नोटिशीची मला कल्पना नाही. आघाडी सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाही. आम्ही सर्व एक आहोत.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.