मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने आज दिलासा दिला आहे. याचबरोबर अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यावरील मुंबई महापालिकेची कारवाई उच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. याचा समाचार शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना 4 नोव्हेंबरला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आज सविस्तर आदेश दिला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रद्द करावा या मागणीवर उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर गोस्वामी यांच्यासह नितीश सारडा आणि फिरोज मोहम्मद शेख यांच्या अंतरीम जामिनाची मुदत चार आठवडे राहणार आहे.
दरम्यान, अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेने केलेली कारवाई मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे महापालिकेबरोबरच हा शिवसेनेलाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
आज एकाच दिवशी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा निर्णय राज्य सरकारच्या विरोधात गेला आहे. या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. ते म्हणाले की, एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत. आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?
सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशाप्रकारे चिरडून टाकता येत नसतो, हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, एक अभिनेत्री मुंबई पोलिसांना माफिया आणि मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणते. न्यायालयाच्या निर्णयावर आनंदित होणारे राजकीय पक्ष याच्याशी सहमत आहेत का? न्यायाधीशांबद्दल गैर बोलणे न्यायालयाचा अवमान ठरते तर मग महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल बोलणे अवमान नाही का?
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.