
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत पत्रकार परिषदेला सुरुवात केली. मला असं वाटतंय ही आंतराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन आले होते. त्यांनी सर्वांनी आम्हाला ‘आगे बढो’ असे सांगितले आहे. त्या सर्वांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. तू काही पाप केलं नसशील, तर कोणाच्या बापाला घाबरू नका, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगायचे. त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितले आहे, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतच्या सुरुवातीला सांगितले. (Sharad Pawar call to Sanjay Raut before press conference)
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोविड सेंटरचे कंत्राट आणि वाईन विक्रीच्या परवानगीवरून खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करायला सुरुवात केली होती. त्यानंतर राऊत यांनी सोमवारी भाजप नेत्यांचा भांडाभोड करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज राऊत यांनी शिवसेनेचे खासदार, आमदार आणि नेत्यांसह पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राऊत यांनी वरील माहिती दिली.
शिवसेना वास्तूला ऐतिहासिक महत्व आहे. या वास्तूने अनेक हल्ले पचवले आहेत. याच वास्तूच्या खाली बॉम्बस्फोट झाले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना येथूनच नमस्कार करतो. ते वर्षा बंगल्यावरून पत्रकार परिषद पाहत आहेत. तुम्ही पुढे जा, मराठी माणसांवर ज्या पद्धतीने आक्रमण सुरू आहे, त्या आक्रमणाविरुद्ध कोणीतरी रणशिंग फुंकायला हवं होते. ते ऐतिहासिक काम करायला हवं. ते मी करत आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र ही गांडूची औलाद नाही, मराठी माणूस नामर्द नाही. तुम्ही कितीही वार केले, तर आम्ही घाबरणार नाही, असा संदेश देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. शिवसेना असेल, ठाकरे परिवार असेल, आमचे आनंदराव अडसूळ असतील, रवींद्र वायकर, अनिल परब, भावना गवळी, राष्ट्रवादीचे प्रमुख, पवार कुटुंबीय यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ले सुरू आहे. हे देशावरचे संकट आहे. पश्चिम बंगालमध्येही असेच चालले आहे, असेही त्यांनी सांगितले.
भाजपचे काही लोक दिल्लीत मला तीनवेळा भेटले, त्यांनी आम्हाला या सरकारमधून बाहेर पडा, असे सांगितले. आम्ही राष्ट्रपती राजवट लावू; नाहीतर काही आमदारांना फोडून भाजपचे सरकार बनवू. तुम्ही त्यात पडू नका. त्यासाठी आम्हाला मदत केली नाही, तर आम्ही टाईट करू आणि फिक्स करू. तुम्हाला नंतर पश्चाताप होईल, असे त्यांनी मला धमकावले. त्यावर मी त्यांना मदत करण्यास नकार दिला. ठाकरे सरकारला नख लागेल, असे कोणतेही कृत्य माझ्याकडून घडणार नाही, असे मी त्यांना ठणकावून सांगितले. त्यानंतर पवार कुटुंबीय, शिवसेना नेते आणि माझे नातेवाईक आणि जवळच्या लोकांवर ईडीचे छापे पडू लागले, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रातील सरकार त्यांना घालवायचं आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. एक तर तुम्ही सरेंडर व्हा, गुडघे टेका, अशा धमक्या सतत दिल्या जात आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला १७० चे बहुमत असताना सरकार पडण्याच्या तारखा कशाच्या आधारावर देता? मी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र दिले. तेव्हापासून धमक्या आणि छापे पडण्यास सुरवात झाली. केंद्रिय यंत्रणा माझ्यासारख्या खासदाराला कसा त्रास देत आहेत, हे मी त्यात लिहिले.
महाराष्ट्र सरकार पाडायचा प्रयत्न झाला तर ठिणगी पडेल, असे मी त्यांना सांगितले. मी नकार दिल्यानंतर त्याच्या तिसऱ्या दिवसापासून छापे पडायला सुरवात झाली. त्या आधी मुलुंडचा दलाल (किरीट सोमय्यांचा उल्लेख) पत्रकार परिषद घेतो. तुमचे सरकार महाराष्ट्रात आले नाही; म्हणून तुम्ही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करता. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला गुडघे टेकायला शिकवले नाही, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर माझ्या आजूबाजूच्या लोकांना अडकावयचा प्रयत्न केला. मराठी माणसाने धंदा करूच नये, असे यांना वाटते. मुलांना फोन करून धमकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतकं निर्घृण राजकारण झालं नसेल. पण भाजपने ते केला आहे, असेही राऊत यांनी नमूद केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.