ठाकरे-मोदी भेटीवर संजय राऊत म्हणाले, भाजप नेत्यांचे अंदाज नेहमी चुकतात!

मराठा व ओबीसी आरक्षणासह राज्यातील विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
sanjay raut clarifies about narendra modi and uddhav thackeray meet
sanjay raut clarifies about narendra modi and uddhav thackeray meet

नवी दिल्ली : मराठा व ओबीसी आरक्षणासह राज्यातील विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. पण त्याआधी या दोघांमध्ये व्यक्तिगत भेट झाली. जवळपास अर्धा तास ही भेट झाल्याची चर्चा असून त्यावरून राजकीय तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खुलासा केला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणार म्हणजे चर्चा तर होणारचं. ही चर्चा सुरू झाली असेल तर नक्कीच भेट महत्त्वाची आहे. केंद्राने मराठा आरक्षण विषय सोडवावा, कांजूर मेट्रो शेड आशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यांनतर अर्धा तास दोघांची वन टू वन चर्चा झाली. यातून राजकीय संदर्भ ज्यांना काढायचे आहेत त्यांनी काढावेत. मोदींसोबत आमचे जुने संबंध आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून नेहमीच आम्हाला त्यांचा आदर आहे. 

राज्यात नवीन सत्ता समीकरणांचा हा विषय नाही. तसेच, आमचा संघर्ष हा कायमस्वरुपी नाही. केव्हा तरी त्याला पूर्णविराम द्यावा लागतो. केंद्राचा आणि राज्याचा संवाद वाढत आहे. ही बैठक सुरू असताना दोन महत्त्वाचे शिलेदार बाहेर उभे होते. राज्यातील भाजप नेत्यांचे अंदाज आतापर्यंत नेहमीच चुकत आले आहेत. त्यांना वाटलं होतं की दहा पंधरा मिनिटं चर्चा होईल पण मोदींनी 90 मिनिटं वेळ दिला, असेही राऊत यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनीही या भेटीबाबत पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले, राजकीयदृष्या आम्ही सोबत नसलो तरी आमचं नातं तुटलेलं नाही. त्यांना भेटायचं नाही, असं काही नाही. मी नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो. आजही मी भेटलो असेन तर चुकीचे काय आहे. थोड्यावेळ व्यक्तीगत भेट झाली, आमच्यात राज्यातील प्रश्नांवर चर्चा झाली, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत पंतप्रधानांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हेही उपस्थित होते. पण त्याआधी मोदी व ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली. राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे. भाजपशी काडीमोड घेऊन शिवसेने दोन्ही काँग्रेसशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली आहे. सरकार स्थापनेवेळी मोठी राजकीय उलथापालथ झाली. भाजप व शिवेसनेच्या नेत्यांनी एकमेकांवर अनेक प्रहार केले. मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला होता. 

राज्यातील भाजपच्या नेत्यांकडूनही सरकार फार काळ टिकणार नाही, अशी वक्तव्ये सातत्याने केली जात आहेत. 100 कोटी खंडणीच्या मुद्यावरून अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावाचीही चर्चा असून त्यांना अटक होईल, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. बदली प्रकरणामुळंही सरकारची डोकेदुखी वाढली आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजची मोदी व ठाकरे यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com