इंडिगो अधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणात सरकारमधील मंत्री अन् अधिकारी; तेजस्वी यांचा खळबळजनक आरोप

बिहारमधील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याची टीका होत असतानाच इंडिगो कंपनीच्या व्यवस्थापकाच्या हत्येवरुन राज्यातील वातावरण तापले आहे.
rjd leader tejashwi yadav slams cm nitish kumar over law and order in bihar
rjd leader tejashwi yadav slams cm nitish kumar over law and order in bihar

पाटणा : इंडिगो कंपनीचे विमानतळ व्यवस्थापक रुपेशकुमारसिंह यांच्या हत्येने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री निवासापासून थोड्याच अंतरावर झालेल्या या हत्येने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या प्रकरणात सरकारमधील एक मंत्री आणि एका अधिकाऱ्याचा समावेश असल्याचा खळबळजनक आरोप  राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. 

पाटणा विमानतळावरून १२ जानेवारीला कामावरून घरी परतताना रूपेशसिंह यांची हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या अपार्टमेंटसमोरच त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या होत्या. मुख्यमंत्री, राज्यपाल आदींचे निवासस्थान तेथून अवघ्या दोन किलोमीटरवर अंतरावर आहे. सिंह हे अनेक बडे राजकारणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळचे होते. त्यामुळे त्यांच्या हत्येवरुन राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. या हत्येवरुन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विरोधी पक्षांसोबत सत्तेत सहभागी असलेल्या भाजपकडूनही उपस्थित केला जात आहे. 

या प्रकरणी तेजस्वी यादव यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, या हाय प्रोफाईल हत्या प्रकरणात राज्य सरकारमधील एक मंत्री आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हात आहे. यामुळे कोणताही विलंब न लावता हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवायला हवे. घटना घडून एवढे दिवस झाल्यानंतरही पोलिसांना या प्रकरणी काहीही ठोस माहिती सांगता आलेली नाही. सरकारमध्ये सहभागी असलेले भाजप नेते केवळ विधाने करुन आता जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत.  

राज्यातील कायदा व सुव्यस्था ढासळली आहे. सरकारने राज्यातील जनतेला भयमुक्त वातावरण निर्माण करुन द्यावे. राज्यातील परिस्थितीत एक महिन्यात सुधारणा न झाल्यास आमच्या महाआघाडीचे सर्व आमदार दिल्लीला रवाना होतील. आम्ही राष्ट्रपतींना भेटून राज्य सरकारच्या विरोधात तक्रार करु, असा इशाराही तेजस्वी यादव यांनी दिला आहे. 

दरम्यान, या हत्या प्रकरणावरुन प्रसारमाध्यमांशी बोलताना नुकतेच मुख्यमंत्री नितीशकुमार संतापले होते. या हत्या प्रकरणाचा उलगडा करुन दाखवा, असे खुले आव्हानही त्यांनी माध्यमांना दिले होते. ते म्हणाले होते की, तुम्ही चुकीचे आणि अयोग्य प्रश्न विचारत आहात. तुम्हाला जर काही माहिती असेल तर तुम्ही ती पोलिसांना द्या. तुम्ही महान आहात. तुम्ही नेमका कुणाला पाठिंबा देत आहात. मी थेटपणे तुम्हाला विचारत आहे. 

मागील काही काळापासून भाजपने नितीशकुमार यांच्याकडे असलेले गृह खाते काढून घेण्यासाठी दबावतंत्र सुरू केले आहे. अरुणाचल प्रदेशमधील आमदार भाजपने फोडल्याने जेडीयूमध्ये तीव्र नाराजी आहे. असे असतानाही भाजपकडून कुरघोडीचे राजकारण सुरूच आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे गृह, सामान्य प्रशासन, दक्षता आणि सर्वसाधारण प्रशासन या खात्यांचा कार्यभार आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करीत भाजपने गृह खाते मागण्यास सुरवात केली असून, यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com