पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच अर्णब गोस्वामींना माहिती 'लिक' केली!

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट उघड झाले आहे.
rahul gandhi says narendra modi leaked information to arnab goswami
rahul gandhi says narendra modi leaked information to arnab goswami

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड झाले आहे. बालाकोटमधील हल्ल्यासह अतिशय महत्वाची माहिती गोस्वामींना आधीपासूनच असल्याचे यातून समोर आले आहे. यावरुन आता गोस्वामींसह भाजप सरकार अडचणीत आले असून, काँग्रेस नेते राहुल गांधींना आक्रमक भूमिका घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरले आहे.   

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅटवरुन मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. काँग्रेसने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, भाजप नेत्यांनी या प्रकरणी मौन धारण केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी या प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरकारी गोपनीय माहिती पत्रकाराला देणे हे गुन्हेगारी कृत्य आहे. तुम्हाला आता दिसेल की या प्रकरणी कोणतीही कारवाई होणार नाही. कारण पंतप्रधान मोदींनीच ही माहिती दिली आहे. 

बालाकोट हल्ल्यासारख्या मोहिमा मोजक्याच लोकांना माहिती असतात. यात पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, सरसेनाध्यक्ष, लष्करप्रमुख, हवाई दल प्रमुख यांचा समावेश असतो. अशा प्रकारच्या गोपनीय गोष्टी पत्रकाराला कळत असतील तर हा गोपनीयता कायद्याचा भंग आहे. हेच लोक आता स्वत:ला देशभक्त आणि राष्ट्रवादी म्हणवून घेत असून, त्यांची कृती मात्र, अँटी-नॅशनल आहे. याची चौकशी व्हायला हवी. गोस्वामींना नेमकी माहिती कुणी दिली पंतप्रधान की गृहमंत्र्यांनी हे आम्हाला कळायला हवे. 

गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयचा वापर व्यवसायाच्या वाढीसाठी केल्याचे समोर आले आहेत. गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातील स्वत:च्या वजनाचा अभिमानाने उल्लेख केला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com