केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा खोटा...महाराष्ट्रच नव्हे तर भाजपची सत्ता असलेल्या राज्यांतही लस टंचाई

देशभरातकोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडेही विक्रमी पातळीवर पोचले आहेत. आता लशीच्या तुटवड्यावरुन केंद्र विरुद्ध राज्ये असा संघर्ष सुरू झाला आहे.
not only maharashtra some bjp ruled states facing shortage of covid 19 vaccine
not only maharashtra some bjp ruled states facing shortage of covid 19 vaccine

नवी दिल्ली : देशभरात आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडेही विक्रमी पातळीवर पोचले आहेत. देशात कोरोना लशीचा तुटवडा निर्माण झाला असून, अनेक राज्यांनी केंद्र सरकारला लस संपत आल्याचे कळवले आहे. यावरुन केंद्र सरकारने लशीचा पुरेसा साठा असल्याचे सांगत राज्यांवर खापर फोडले आहे. प्रत्यक्षात भाजपचे सरकार असलेल्या राज्यांतही लस टंचाई असून, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून खोटा दावा सुरू असल्याची टीका होत आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वच प्रौढ नागरिकांना कोरोना लस द्यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. यावर आरोग्य मंत्रालयाने लशीचा तुटवडा असल्याचे कारण देत गरज असेल त्यांनाच प्रथम लस देण्याची भूमिका घेतली आहे. वेळ आल्यानंतर सर्वांना लस देण्यात येईल, असेही म्हटले होते. 

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे लशीची मागणी केली होती. राज्यातील लशीचा साठा संपत आल्याची माहितीही त्यांनी दिली होती.  गोंदिया, अकोला, यवतमाळ आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये केवळ एक दिवस पुरेल एवढाच साठा आहे. सातारा जिल्ह्यातील लशीचा साठा संपला असून, कालपासून (ता.७) लस देणे बंद करण्यात आले आहे. दुसऱ्या डोससाठी येणाऱ्या अनेकांना लस न घेता परतावे लागत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसू लागले आहेत. 

मुंबईतील लशीचा साठा संपत आल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनीही जाहीर केले आहे. अशावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन हे मात्र, राज्यांवर खापर फोडत आहेत. पुरेसा साठा असल्याचे केंद्र सरकार सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अनेक राज्यांनी लशीचा तुटवडा असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मात्र, याचा संदर्भ महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी जोडून राजकारण करीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

भाजपशासित उत्तर प्रदेशातील नोएडा आणि गाझियाबादमध्ये लस संपत आली आहे. भाजपचेच सरकार असलेल्या उत्तराखंडनेही लशीचा साठा संपत आल्याचे म्हटले असून, आणखी दहा लाख डोसची मागणी केली आहे. असे असतानाही केंद्रीय आरोग्यमंत्री छातीठोकपणे एकाही राज्यात कोरोना लशीची टंचाई नसल्याचा दावा करीत आहेत. यामुळे लशीच्या टंचाईवरुन आगामी काळात केंद्र विरुद्ध राज्ये असा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com