पंतप्रधान मोदी म्हणतात, बांगलादेशच्या मुक्तीलढ्यासाठी माझंही योगदान अन् मलाही अटक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर असून, कोरोनाचा प्रादुर्भाव देशात सुरु झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.
narendra modi says he was arrested for bangladesh freedom struggle
narendra modi says he was arrested for bangladesh freedom struggle

ढाका : बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी मी माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन केले आणि यासाठी मला तुरुंगातही जावे लागले. हे मी अतिशय अभिमानाने बांगलादेशातील जनतेला सांगत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले. मोदी हे बांगलादेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच विदेश दौर आहे. 

मोदींनी आज मुक्तीलढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. या सर्व हुतात्म्यांनी सत्याच्या विजयासाठी अन्यायायाविरोधात लढा दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. बांगलादेशच्या राष्ट्रीय दिनानिमित्त नॅशनल परेड स्क्वेअरमध्ये आयोजित कार्यक्रमात मोदींनी हजेरी लावली. या वेळी ते म्हणाले की, बांगलादेशच्या मुक्तीलढ्यामध्ये आमच्या जवानांनीही रक्त सांडले. दोन्ही देशांमधील रक्ताचे हेच नाते अत्यंत मजबूत अशा द्विपक्षीय संबंधांना जन्म देईल.  

मोदींनी भाषणात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेचेही कौतुक केले. ते म्हणाले की, आजचा दिवस हा वंगबंधूंचे आदर्श आणि त्यांनी दाखवून दिलेल्या दूरदृष्टीवर वाटचाल करण्याचा आहे. मुक्तियोद्ध्यांच्या भावनांचे स्मरण करण्याची हीच वेळ आहे. बांगलादेशच्या मुक्तीलढ्याला भारताच्या कानाकोपऱ्यातून मोठा पाठिंबा मिळाला होता. या लढ्यातील इंदिरा गांधींचे योगदान सर्वांनाच माहिती आहे. खुद्द अटलबिहारी वाजपेयींनी या मुक्तीलढ्यातील क्रांतिकारकांचे कौतुक केले होते. माझ्या आयुष्यात बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. विशीमध्ये असतानाच मी माझ्या सहकाऱ्यांसोबत तेव्हा माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन केले होते. त्यावेळी मी बांगलादेशसाठी तुरुंगवासही भोगला होता. 

बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मोदींनी आज बांगलादेशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, भारत आणि बांगलादेश यांच्या मैत्रीला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होतील. वंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष दोन्ही देशांमधील संबंधांना आणखी बळकट करण्यास हातभाग लावेल. वंगबंधूंनी सामान्यांसाठी मोठा त्याग केला. त्यांना गांधी शांती सन्मान देता आला ही भारतीयांसाठीही मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com