पंतप्रधान मोदींचा फोनही मुकुल रॉय यांना पक्ष सोडण्यापासून थांबवू शकला नाही!

पश्चिम बंगालमधील पराभवानंतर राज्यातील भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे भाजपला आता गळती लागली आहे.
narendra modi attempt to stop mukul roy from joining tmc failed
narendra modi attempt to stop mukul roy from joining tmc failed

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) पराभवानंतर राज्यातील भाजपला (BJP) गळती लागली आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार मुकुल रॉय (Mukul Roy) यांची आज घरवापसी झाली आहे. रॉय यांनी आज तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही रॉय यांच्या मनधरणीचा केलेला प्रयत्न अपयशी ठरल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. 

मागील काही आठवड्यांपासून रॉय यांच्या घरवापसीची चर्चा होती. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी नुकतीच पक्षाची बैठक कोलकत्यात बोलावली होती. या बैठकीला रॉय यांनी दांडी मारली. मागील काही दिवसांपासून रॉय यांनी मौन धारण केले  होते. सार्वजनिकरीत्या त्यांनी कोणतेही विधान केलेले नव्हते. मात्र, रॉय यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी ते तृणमूलमध्ये परततील, असे संकेत दिले होते.  

मुकुल रॉय यांच्या पत्नी आजारी असून, कोलकत्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी नुकतीच रुग्णालयाला भेट दिली होती. यानंतर भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. नंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच थेट रॉय यांनी दूरध्वनी करुन त्यांच्याशी चर्चा केली होती. मोदी आणि रॉय यांच्यात काही मिनिटे संवाद झाला होता.

खुद्द पंतप्रधान मोदींनी थेट फोन करुन रॉय यांच्या मनधरणी केली होती. यानंतरही रॉय यांचा निर्धार कायम होता. याचबरोबर भाजप नेते व विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनीही तातडीने दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा केली होती. यानंतर पक्ष नेतृत्वाने रॉय यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. तरीही रॉय हे पक्ष सोडण्यावर ठाम होते. अखेर आज त्यांनी पक्षाला अधिकृतरीत्या रामराम केला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मुकुल रॉय यांनी ममतांवर व्यक्तिगत पातळीवरील टीका करणे टाळले, त्यामुळे त्यांचा समावेश मवाळ नेत्यांमध्ये होतो. याचवेळी सुवेंदू अधिकारी यांनी सातत्याने ममतांना लक्ष्य केले त्यामुळे त्यांचा समावेश जहाल नेत्यांमध्ये होतो. मवाळ नेत्यांसाठी तृणमूलचे दरवाजे खुले आहेत. या पार्श्वभूमीवर तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी मुकुल रॉय यांची घेतलेली भेट महत्वपूर्ण होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपमज्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये मुकुल रॉय यांचा समावेश होता. भाजपचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमधून आलेले अनेक नेते उघडपणे घरवापसीबद्दल बोलू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रॉय हे पुन्हा तृणमूलमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली. भाजपमध्ये ते बाजूला फेकले गेले असून, ते नाराज असल्याचेही बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे ही चर्चा सुरू झाली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com