भोपाळ : भाजपकडून काँग्रेसवर टूलकिटचा (Congress Toolkit) आरोप केला जात असताना आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते कमलनाथ (Kamal Nath) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कोरोनाच्या (Covid-19) भारतीय प्रकाराला मोदी घाबरतात, असा टोला कमलनाथ यांनी लगावला आहे. मध्य प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
कमलनाथ म्हणाले की, सुरवातीला हा चायनीज कोरोना होता. नंतर तो भारतीय झाला. आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान कोरोनाच्या भारतातील प्रकाराला घाबरत आहेत. सिंगापूरसारख्या देशाने आता भारतीयांना बंदी केली आहे. कुणीतरी मला सांगितलं की तेथे कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या भारतीय मुलाचा प्रवेशही रद्द करण्यात आला. कारण काय तर तो भारतातून येणार होता आणि सोबत तो कोरोनाचा भारतातील प्रकार घेऊन आला असता.
भाजपच्या टूलकिटच्या आरोपांवर बोलताना कमलनाथ म्हणाले की, काय आहे टूलकिट? आपले शास्त्रज्ञ या विषाणूला भारतातील प्रकार म्हणत आहेत. जगातील इतर देशही असेच म्हणत आहेत. केवळ भाजपच्या सल्लागारांना हे मान्य नाही.
मध्य प्रदेशातील कोरोना मृत्यूंबाबत बोलताना कमलनाथ म्हणाले की, सरकारने नोंदवलेले कोरोना मृत्यूचे आकडे खोटे आहेत. आतार्यंत कोरोनामुळे लाखो जणांचा मृत्यू झाला आहे. माझ्या माहितनुसार भोपाळ आणि इतर भागात सुमारे 1 लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. खरा मृत्यूचा आकडा केवळ या काळात किती मृत्यू प्रमाणपत्रे देण्यात आली यावरुनच सिद्ध होईल. याचबरोबर किती मृतांवर अंत्यसंस्कार झाले यातूनही खरी आकडेवारी समोर येईल. एकूण मृत्यूंमधील 80 टक्के कोरोना मृत्यू आहेत. तरीही सरकार याचा इन्कार करीत असून, याला पुरावा नसल्याचे म्हणत आहे. कुणाला सरकार मूर्ख बनवत आहे. खोटे बोलून कोरोना जात नाही.
यावर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी उत्तर दिले आहे. देशाचा अपमान केल्याबद्दल कमलनाथ यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे केली आहे. मिश्रा म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांचे विधान ऐकून मला धक्का बसला आहे. आधी अरविंद केजरीवाल यांनी भारतातील कोरोना असे म्हटले. आता कमलनाथ तसेच म्हणत आहेत. मला खात्री आहे की कमलनाथ यांचे टूलकिट कनेक्शन आहे.
भारतात आढळलेल्या बी.1.617 या कोरोनाच्या प्रकाराला भारतीय प्रकार असे नाव ठेवू नये, असे भारताने जागतिक आरोग्य संघटनेला (डब्लूएचओ) बजावले होते. यावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी यामागे काँग्रेसचे टूलकिट असल्याचा आरोप केला होता. केंद्रातील भाजप सरकारला बदनाम करण्यासाठी काँग्रेसने कट आखल्याचा आरोप पात्रांनी केला होता. या प्रकरणी पात्रा यांनी केलेले ट्विट दिशाभूल करणारे असल्याचे ट्विटरने जाहीर केले होते.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.