चिराग पासवान यांच्याबाबत मोदींचे सूचक मौन अन् सत्तासमीकरणांची खेळी

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारात उडी घेतली आहे.
narednra modi did not mention chirag paswan in election rally in bihar
narednra modi did not mention chirag paswan in election rally in bihar

नवी दिल्ली : बिहारमध्ये प्रचाराला आता जोर चढला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट मैदानात उतरले आहेत. मोदींनी जाहीर सभेत बोलताना दिवंगत सहकारी रामविलास पासवान  यांच्या आठवणी जागवून जनभावनेला हात घातला होता. मात्र, पासवान यांचे पुत्र चिराग यांच्याबाबत मोदींनी सूचक मौन पाळले आहे. आगामी सत्तासमीकरणे डोळ्यासमोर ठेवून मोदींना ही खेळी खेळल्याची चर्चा सुरू आहे. एनडीएपासून फारकत घेणाऱ्या चिराग यांच्यामुळे भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या संयुक्त जनला दलातील अस्वस्थता मात्र, वाढली आहे. 

मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. याचवेळी देश पातळीवर भाजपला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी घेतली आहे. चिराग यांनी हे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) लक्ष्य करीत आहेत. चिराग पासवान हे स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवून घेत आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत मोदींसोबत राहू, असे चिराग जाहीरपणे बोलत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल बिहारमधील प्रचारात उडी घेतली. त्यांनी सासाराम, गया आणि भागलपूर येथे जाहीर सभा घेतल्या. मोदींनी काल भाषणात बिहारच्या दोन पुत्रांचा उल्लेख केला. यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोदी म्हणाले होते की, बिहारने नुकतेच दोन पुत्र गमावले आहेत. मी रामविलास पासवान यांना आदरांजली अर्पण करतो. ते शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य गरीब आणि दलितांच्या कल्याणासाठी वाहिले. याचप्रकारे बाबू रघुवंशप्रसादसिंह यांनी गरीबांसाठी काम केले. मी त्यांनाही आदरांजली वाहतो. 

मोदींनी रामविलास पासवान यांचा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चिराग पासवान हे एनडीएमधून बाहेर पडले असले तरी ते मोदींचे गुणगाण गाताना थकत नसल्याचे चित्र आहे. याचवेळी मोदींनीही चिराग यांचे पिता रामविलास पासवान यांच्या आठवणी जागवल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. पासवान यांच्या निधनानंतर जनतेत असलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा व्हावा, असा उद्देश यामागे असल्याची चर्चा  सुरू झाली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी यांनी चिराग पासवान यांच्याबाबत सूचक मौन पाळले आहे. मोदी यांनी असे करण्यामागे अनेक कारणे आहेत. रामविलास पासवान यांचा उल्लेख मोदींनी केला कारण त्यांची मोठी व्होटबँक आहे. त्यांच्या समर्थकांना न दुखावण्याची भूमिका मोदींनी घेतली. मोदींनी चिराग यांचा भाषणात एकदाही उल्लेख केला नाही. कारण बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी पुढील सत्तासमीकरणात चिराग महत्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास भाजपला वाटत आहे. यामुळे मोदींनी चिराग यांचे नाव घेऊन त्यांना लक्ष्य करणे टाळले. 

मोदींनी चिराग यांचा अनुल्लेख करुन वेळ मारून नेली. कारण चिराग यांच्यावर जाहीरपणे टीका केल्यास ते विरोधी पक्षांकडे जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर निवडणूक निकालानंतर नितीशकुमार यांच्यावर दबाव टाकण्यासारखी परस्थिती निर्माण झाल्यास चिराग हे भाजपचे हुकुमाचे एक्का असतील. चिराग यांच्या एलजेपीमध्ये भाजपचे अनेक बंडखोर नेते दाखल झाले आहेत. निकालानंतर हे नेते पुन्हा भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याचवेळी चिराग हे जेडीयूच्या विरोधात उमेदवार देत आहेत आणि भाजपला पाठिंबा देत आहेत. अशा परिस्थितीत चिराग यांचा भाजपला तोट्यापेक्षा फायद्याच अधिक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com