विधानपरिषद निवडणूक : भाजपमध्ये खदखद वाढली

भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर पक्षातील खदखद वाढली आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना आमदारकीची संधी देण्यात आल्यामुळे पक्षातील अनेक नेते संतप्त झाले आहेत. बाहेरून आलेल्यांना संधी देण्याचा हा पायंडा चुकीचा आहे, अशी भावना बहुतांश नेत्यांची आहे. पक्षात काही नेत्यांची एकाधिकारशाही वाढल्याची तक्रारही अनेकांनी केली आहे.
MLC election unrest increased in bjp over candidature
MLC election unrest increased in bjp over candidature

मुंबई : भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर पक्षातील खदखद वाढली आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना आमदारकीची संधी देण्यात आल्यामुळे पक्षातील अनेक नेते संतप्त झाले आहेत. बाहेरून आलेल्यांना संधी देण्याचा हा पायंडा चुकीचा आहे, अशी भावना बहुतांश नेत्यांची आहे. पक्षात काही नेत्यांची एकाधिकारशाही वाढल्याची तक्रारही अनेकांनी केली आहे.

भाजपने विधान परिषदेच्या चार जागांसाठी उमेदवार निश्‍चित केले आहेत. यामध्ये दुसऱ्या पक्षातून अलीकडेच भाजपमध्ये दाखल झालेल्या रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपिचंद पडळकर यांना उमेदवारी मिळाली आहे; तर नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके, नांदेडच्या डॉ. अजित गोपछडे यांना पक्षाने संधी दिली आहे.

पाटील-फडणवीसांचा अंतिम शब्द
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ खडसे यांना संधी देण्याची विनंती केल्याचे समजते; मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलेल्या उमेदवारांच्या नावावर केंद्रीय नेतृत्वाने शिक्कामोर्तब केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गोपिचंद पडळकर, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी मिळवून दिली; तर चंद्रकांत पाटील यांनी रणजितसिंह मोहिते-पाटलांना दिलेला शब्द पाळला.

बाहेरच्यांना संधी
विधानसभा निवडणुकीत तावडे, खडसे, बावनकुळे, प्रकाश मेहता, राज पुरोहित यांचे तिकीट कापण्यात आले होते. याच वेळी बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली गेली. निवडणुकीत भाजपचे संख्याबळ घटून 105 वर आले. पक्षाला विरोधी बाकावर बसावे लागले; मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद बाहेरून आलेल्या प्रवीण दरेकरांना मिळाले. या वेळी निष्ठावंतांना संधी मिळेल अशी आशा होती; मात्र ती फोल ठरल्याची खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

पक्षांतर्गत धुसफुस वाढणार
पक्षाचा पराभव होऊनही सर्वसमावेशक निर्णय घेतले जात नाहीत, ही पक्षातल्या नेत्यांची खरी खदखद आहे. हे सर्व नाराज नेते लवकरच एकत्र येण्याची शक्‍यता आहे. पक्षसंघटनेतील बेदिली, काही जणांनी चालवलेली एकाधिकारशाही दिल्लीकरांच्या कानावर घालणे महत्त्वाचे असल्याचे मत बहुतांश नेत्यांनी व्यक्त केले आहे.

सामाजिक संतुलनाचे काय?
तीन ओबीसी, एक मराठा उमेदवार देऊन पक्षाने सामाजिक संतुलन राखल्याचा दावा केला आहे; मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षापासून दूर गेलेल्या तेली, माळी, मातंग आणि इतर समाजघटकांना जोडण्याचा प्रयत्न या उमेदवारांकडून झाल्याचे दिसले नाही. धनगर समाजातील डॉ. महात्मे, महादेव जानकरांना पक्षाने वेळोवेळी संधी दिली. मग गोपिचंद पडळकरांना उमेदवारी देण्यामागची भूमिका काय, असाही प्रश्‍न विचारला जात आहे. तेली समाजाच्या चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाला विदर्भात फटका बसला; मात्र त्याचाही पक्षाने विचार केला नाही. या चार उमेदवारांच्या यादीत एका महिलेला उमेदवारी मिळाली असती तर चांगला संदेश देता आला असता, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. नांदेडच्या डॉ. अजित गोपछडे यांना कुठलाही जनाधार नसताना उमेदवारी मिळाल्याचा आक्षेप बहुतांश नेत्यांचा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com