मुंबई : मागील वर्षभरापासून कोरोनाबाधित (Covid-19) रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येत असलेली 'प्लाझ्मा थेरपी' बंद करण्यात आली होती. आता त्यापाठोपाठ रेमडेसिविर (Remdesivir) हे इंजेक्शनही उपचाराच्या यादीतून वगळण्यात येणार आहे. रेमडेसिविर उपचाराच्या यादीतून वगळण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) घेतला असून, आमचाही यावर विचार सुरू असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज सांगितले.
याविषयी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, डब्लूएचओने रेमडेसिविर उपचारातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. याची कारणेही डब्लूएचओने दिली आहेत. देशातील टास्क फोर्स आणि राज्यातील टास्क फोर्सशी याबाबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल. राज्यात साडेतीनशे व्हेंटिलेटर बंद असल्याची माहिती मिळाली आहे. ते सुरू करण्यासाठी तंत्रज्ञांचे पथक तयार करण्याची गरज आहे.
केंद्र सरकारकडून पावले उचलली जाणार
प्लाझ्मा थेरपीप्रमाणेच रेमडेसिविरही परिणामकारक नसल्याचे नवी दिल्ली येथील गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॅा. डी. एस. राणा यांनी म्हटलं आहे. इंजेक्शनचे सकारात्मक परिणामांचे कोणतेही पुरावे आढळून न आल्याने कोरोना उपचारातून लवकरच वगळण्याबाबत विचार व्हायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं टास्क फोर्सकडून लवकरच रेमडेसिविरला उपचारांच्या यादीतून वगळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डॅा. राणा म्हणाले, प्लाझ्मा थेरपीमध्ये आपण आधी कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा रुग्णाला देतो. जेणेकरून त्याच्यामध्ये अँटीबॅाडीज तयार होतील. पण संसर्ग झाल्यानंतर तशाही अँटीबॅाडी तयार होतात. मागील वर्षभरापासून आम्ही पाहिले की, प्लाझ्मा देऊनही रुग्णाच्या स्थितीत फारसा फरक पडत नाही. तसेच प्लाझ्मा सहज उपलब्धही होत नाही. शास्त्रीय आधारावर प्लाझ्मा थेरपीची सुरूवात झाली अन् पुरावांच्या आधारे ती बंद करण्यात आली.
रेमडेसिविरच्या परिणामकारकतेबाबतही कोणतेही पुरावे आढळले नाहीत. ज्या औषधांचा काही उपयोग होत नाही, त्यांचा वापर थांबवायला हवा. त्यामध्ये रेमडेसिवरचाही समावेश आहे. ही औषधे लवकरच वगळली जाऊ शकतात. सध्या केवळ तीनच औषधे परिणामकारक ठरत आहेत, असेही राणा यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेक डॅाक्टरांकडून लगेचच रेमडेसिविर इंजेक्शन सुरू केले जाते. त्यामुळे मागील महिन्यात रेमडेसिविरचा मोठा तुवटडा निर्माण झाला होता. काळाबाजारही मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. नातेवाईक इंजेक्शनसाठी कित्येक पटीने जागा पैसे देत होते. इंजेक्शनसाठी रात्रंदिवस रांगा लागत होत्या. अजूनही इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच आहे. त्यामुळं या कालावधीत केंद्र सरकारनं रेमडेसिविर जादूची कांडी नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.