महाआघाडीनंतर एनडीएमध्ये फूट...लोक जनशक्ती पक्षाची वेगळी चूल

बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राजकीय पक्षांची आघाड्यांची जुळवाजुळव सुरू असताना त्यात बिघाडी होण्याचेच प्रकार सध्या सुरू आहेत.
lok janshakti party breaks ties with nda in bihar assembly election
lok janshakti party breaks ties with nda in bihar assembly election

नवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र दिसत आहे. महाआघाडीतील आरजेडी, काँग्रेस आणि डावे पक्ष यांचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर काल महाआघाडीत फूट पडली होती. आज केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे बिहारमधील विधानसभा निवडणूक या वेळी राजकीय पक्षांच्या व्हर्च्युअल प्रचारामुळे गाजणार आहे. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबरला असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  

यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीवेळी सहकारी असलेले पक्ष आता विरोधात मैदानात आहेत. मागील वेळी लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जेडीयू आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र होते. त्यावेळी भाजपने लोकजनशक्ती पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्षासोबत आघाडी केली होती. मागील निवडणुकीच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए)  विजय झाला होता. या विजयानंतर काही महिन्यांमध्येच नितीश यांनी लालूंच्या पक्षाची साथ सोडत भाजपसोबत आघाडी केली होती. यामुळे विरोधी बाकांवरील भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष सत्तेत आला होता. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. आधी या महाआघाडीचे घटक असलेले जितनराम मांझी आता एनडीएमध्ये गेले आहेत. याचवेळी एनडीएमधील लोक जनशक्ती पक्षाने वाढीव जागा मिळाव्यात म्हणून आग्रह धरला आहे. लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी जास्त जागा मिळाव्यात म्हणून आग्रही भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे एनडीएचे जागावाटप लांबत चालले आहे. 

या पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पक्षाच्या नेत्यांच्या बैठक आज चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रामविलास पासवान या वेळी उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीनंतर पक्षाने निवेदन जाहीर केले आहे. यात म्हटले आहे की, राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत आमची भक्कम आघाडी आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर आमचे जेडीयूसोबत वैचारिक मतभेद आहेत. यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीनंतर आमचे विजयी उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गावर भाजपसोबत असतील.  

काँग्रेस आणि आरजेडी यांच्यातही जागा वाटपावरुन तिढा निर्माण झाला होता. अखेर हा तिढा सुटला. आरजेडीला सर्वाधिक 144 जागा मिळाल्या आहेत. त्याखालोखाल काँग्रेसला 70 जागा मिळाल्या आहेत. डाव्यां पक्षांमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 4, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 6 आणि मार्क्स आणि लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाला 19 जागा देण्यात आल्या आहेत. आरजेडीच्या कोट्यातून झारखंड मुक्ती मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांना जागा देण्यात येणार होत्या. 

जागावाटपाची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच क्षणी विकासशील इन्सान पार्टीने महाआघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. याबाबत पार्टीचे नेते मुकेश साहनी म्हणाले होते की, अतिमागास वर्गाच्या पाठीत आरजेडीने खंजीर खुपसला आहे. हाच अतिमागास वर्ग आता आरजेडीला निवडणुकीत योग्य उत्तर देईल. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com