पश्चिमं बंगालमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; ममतांच्या पाठीशी कट्टर विरोधक डावे

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मदतीला डावे धावून आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये मागील काही वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं आहे.
left front support mamata banerjee in controversy against governor
left front support mamata banerjee in controversy against governor

कोलकता : पश्चिम बंगालचे (West Bengal) राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) आणि राज्य सरकार असा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल (Governor) दिल्लीत दाखल झाले असून, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत ते दिल्लीत पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या मदतीला डावे (Left Front) धावून आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये मागील काही वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं आहे. 

राज्यपाल दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची शक्यता आहे. त्यांना बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचा अहवाल ते सादर करतील, अशी चर्चा आहे. भाजपनेही हा मुद्दा उचलून धरल्याने सातत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केलं जात आहे. तृणमूल काँग्रेसनेच हा हिंसाचार घडवून आणल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. तर ममतादीदींनी भाजपकडे बोट दाखविले आहे. 

या पार्श्वभूमीवर आता डाव्या आघाडीने ममतांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. डाव्या आघाडीचे अध्यक्ष विमान बोस यांनी म्हटले आहे की, राज्यपाल हे भाजपचे सदस्य नाहीत परंतु, ते भाजपचे नेते असल्याप्रमाणे वागत आहेत. हे राज्यपालांचे काम नाही. ते स्वत:ला भाजपचा नेता असल्याचे दाखवत आहेत. हे योग्य नाही. पश्चिम बंगालमध्ये तरी राज्यपालांची अशी भूमिका स्वीकारार्ह नाही. भाजपच्या प्रवक्त्याप्रमाणे राज्यपाल बोलत असून, त्यांचे वर्तन पक्षपाती आहे. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बंगालमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून खून करण्यात आले. महिलांवर अत्याचार करण्यात आले, असे अनेक गंभीर आरोप भाजपने केले आहेत. या हिंसाचारामध्ये तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या हिंसाचारानंतर राज्यपालांनी राज्याच्या मुख्य सचिवांसह पोलिस महासंचालकांची बैठक घेतली. केंद्रीय गृह मंत्रालयाचे एक पथक हिंसाचार झालेल्या भागाची पाहणीही करून गेले आहे. 

राज्यपाल धनखर यांच्याकडून सातत्याने ममता बॅनर्जी यांनाही लक्ष्य केलं जात आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चांगली नसल्याचा आरोप करत त्यांनी राज्यात लोकशाही श्वास घेऊ शकत नाही, असा आरोप केला आहे. राज्यातील स्थिती खूपच चिंताजनक असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. यापार्श्वभूमीवर राज्यपाल काल रात्री दिल्लीत दाखल झाले. ता. 18 जूनपर्यंत ते दिल्लीतच राहणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com