पायलट यांनी 50 ते 60 वेळा फोन केला पण राहुल अन् प्रियांका गांधींनी उचललाच नाही!

राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट हे पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने नाराज आहेत. यामुळे त्यांनी नुकताच दिल्ली दौरा केला होता.
kirodilal meena says rahul gandhi not responding to sachin pilot call
kirodilal meena says rahul gandhi not responding to sachin pilot call

नवी दिल्ली : राजस्थानमधील (Rajasthan) काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) हे पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने  नाराज आहेत. यामुळे त्यांनी नुकताच दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात पायलट यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना 50 ते 60 कॉल करुनही त्यांना भेट देण्यात आली नव्हती, असा गौप्यस्फोट भाजपचे खासदार किरोडीलाल मीना यांनी केला आहे. 

सचिन पायलट हे 11 जूनला सायंकाळी दिल्लीत दाखल झाले होते. पक्षाच्या नेतृत्वाची ते भेट घेणार होते. पायलट यांनी मागील वर्षी केलेल्या बंडावेळी पक्षाने दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. यातच राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने पायलट यांनी पक्षाला पुन्हा एकदा इशारा दिला होता. परंतु, पक्षश्रेष्ठींची भेट न घेताच पायलट हे पाच दिवसांनंतर दिल्लीतून राजस्थानला परतले होते. 

याबाबत बोलताना किरोडीलाल मीना म्हणाले की, पायलट यांनी दिल्ली दौऱ्यात तब्बल 50 ते 60 फोन राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना केले होते. परंतु, दोघांनीही त्यांचा फोन उचललाच नाही. स्वाभिमानी व्यक्तीने एवढा अपमान सहन करु नये. पायलट यांनी तातडीने आता निर्णय घ्यावा. श्वास गुदमरत असताना काँग्रेसमध्ये राहण्यापेक्षा त्यांनी स्वाभिमानाने दुसरा निर्णय घ्यावा.

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली होती. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा याला विरोध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पायलट यांची ताकद कमी झाली आहे. त्यांना पाठिंबा देणारे आमदारही कमी होऊ लागले आहेत, यामुळे पक्षही त्यांच्या दबावाला फारसा बळी पडत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राजस्थानमधील सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे. पायलट यांनी बंड केले त्यावेळी साथ देणाऱ्या अपक्ष व इतर आमदारांना डावलता येणार नाही, असे गेहलोत यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. हा आता वादाचा मुद्दा बनला आहे. मागील वर्षीही पक्षाच्या विरोधात बंड करुन पायलट दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात आले होते. आता त्यांची मागणी मान्य केल्यास याची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती पक्षाला वाटत आहे. 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com