बहिणीने नवीन पक्ष स्थापन केला पण मुख्यमंत्री तिकडे फिरकलेही नाहीत!

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला यांनी वायएसआर तेलंगण पक्ष हा नवा पक्ष स्थापन केला आहे.
jagan mohan reddy did not attend sister y s shramila new party launch
jagan mohan reddy did not attend sister y s shramila new party launch

हैदराबाद  : आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला (Y.S.Sharmila) यांनी वायएसआर तेलंगण पक्ष हा नवा पक्ष स्थापन केला आहे. वाय.एस.राजशेखर रेड्डी यांच्या जन्मदिनी ८ जुलैलाच त्यांनी पक्षाची स्थापन झाली असली तरी या वेळी जगनमोहन यांची अनुपस्थिती सर्वांना खटकणारी होती. बहिणीची राजकीय इनिंगला त्यांचा विरोध असल्याचे समजते. 

शर्मिला यांच्या पक्ष स्थापनेचा कार्यक्रम हैदराबादमध्ये सुरू होता, त्यावेळी जगनमोहन हे शेजारील अनंतपूर जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत होते. वायएसआर शर्मिला आणि विजयालक्ष्मी यांनी पक्षस्थापनेच्या आधी वायएसआर यांच्या स्मारकाला भेट दिली होती. नंतर सायंकाळी स्वतंत्रपणे जाऊन जगनमोहन यांनी स्मारकाच्या भेट देऊन पित्याला अभिवादन केले. राजशेखर रेड्डी हे आंध्र प्रदेशचे (अविभाजित) अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री होते. त्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत 2009 मध्ये मृत्यू झाला होता. आधी त्यांचे पुत्र जगनमोहन यांनी काँग्रेसपासून वेगळे होत वायएसआर काँग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. आता त्यांच्या कन्येने स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगनमोहन रेड्डी यांनी बहिणीच्या सर्व राजकीय  घडामोडींपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. जगनमोहन आणि शर्मिला यांच्यात मागील काही महिन्यांपासून मतभेद आहेत. जगममोहन यांनी बहिणीला वायएसआर काँग्रेस पक्षात कोणतेही महत्त्व न देता दूर ठेवले होते. या पार्श्‍वभूमीवर शर्मिला या मागील काही महिन्यांपासून वायएसआर यांच्या समर्थकांशी चर्चा करीत होत्या. काँग्रेस पक्षातील वायएसआर यांचे समर्थकही त्यांच्या संपर्कात होते. 

शर्मिला यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे बोलताना जगनमोहन रेड्डी यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले होते की, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे माझे मोठे बंधू आहेत. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद माझ्यामागे आहेत. आंध्रात ते स्वतःचे काम पुढे नेत आहे. म्हणूनच तेलंगणमध्येही राजन्नाचे राज्य आणण्याची गरज असल्याने मी येथे नवा पक्ष स्थापन करीत आहे. 

शर्मिल यांच्या पक्ष स्थापनेचा जंगी कार्यक्रम हैदराबादमध्ये झाला. या वेळी शर्मिला यांचा मोठ्या गर्दीसह रोड शो झाला आणि लेझर शोचा कार्यक्रमही झाला. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की, तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे राज्यात 100 दिवसांची पदयात्रा मी करणार आहे. या यात्रेत मी राज्यातील जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com