'ऑपरेशन अर्णब'ची आधीपासूनच तयारी...महानिरीक्षक मोहितेंचे नियोजन अन् वाझेंची अंमलबजावणी

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांना पकडण्यासाठी गृह विभागाने 'ऑपरेशन अर्णब'ची आधीपासूनच तयारी केली आहे.
home department planned operation arnab for arnab goswami arrest
home department planned operation arnab for arnab goswami arrest

मुंबई :  रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांना पकडण्यासाठी गृह  विभागाने 'ऑपरेशन अर्णब'ची आधीपासूनच तयारी केली होती, अशी माहिती समोर येत आहे. याचबरोबर कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्यासह 40 जणांचे पथक आधीच तयार करण्यात आले होते, असेही स्पष्ट झाले आहे. 

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून पोलिसांना बुधवारी अटक केली होती. पोलिसांनी मारहाण केल्याचा दावा गोस्वामी न्यायायलात केला.भाजपचे अनेक नेते हे गोस्वामींवरील कारवाईवरुन महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारला लक्ष्य करीत आहे. यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला आहे. गृह विभागाला पुढे काय होणार याचा आधीच अंदाज आल्याने अतिशय सावधगिरीने 'ऑपरेशन अर्णब'ची आखणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबतचे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे. 

अन्वय नाईक आणि कुमूद नाईक आत्महत्येप्रकरणी पुन्हा तपास करण्याची परवानगी रायगड पोलिसांना मिळाल्यानंतर 'ऑपरेशन अर्णब'ची सुरुवात झाली. यासाठी गृह विभागाने कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली 40 जणांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकात रायगड आणि मुंबई पोलिसांचा समावेश होता. गोस्वामी यांना अटक करण्याची पूर्ण योजना मोहिते यांनी आखली होती. ती पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्यावर सोपवण्यात आली होती. 

गोस्वामी यांना अटक करणे हे सर्वांत कठीण काम होते. कारण त्यांच्याकडून पोलिसांना विरोध होण्याची जास्त शक्यता होती. याचबरोबर त्यांच्याकडून पोलिसांना चिथावणी दिली जाण्याची शक्यता होती. यासाठी सर्वच पथकाला काळजी घेण्यासोबत गोस्वामी यांनी चिथावणी दिल्यास कोणतीही कृती करु नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. 

यासाठी गोस्वामींच्या घरावर काही दिवस पाळत ठेवण्यात आली होती. त्यांच्या इमारतीवर नजर ठेवण्यात येत होती. यासाठी अतिशय खबरदारी घेण्यात येत होती. कारण गोस्वामी यांना हे कळाले असते तर ते शहर सोडून पळून जाण्याची शक्यता होती. गोस्वामी यांना पोलिसांनी सकाळी अटक केली. ते सकाळी घरातच असतो, यामुळे ही वेळ निवडण्यात आली होती. कोण दरवाजा वाजवणार, कोण गोस्वामी यांच्याशी बोलणार, त्यांच्या कुटुंबीयांशी कोण संवाद साधणार यासारख्या बारीकसारीक गोष्टीही आधीच ठरवण्यात आल्या होत्या.

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली.  २०१८ मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

त्यावेळी पोलिसांना अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com