नवी दिल्ली : रामदेवबाबा (Ramdev Baba) यांच्या पतंलजलीने (Pantanjali) कोरोनावरील औषधाचा दावा करुन वाद ओढवून घेतला होता. यावर पतंजलीसोबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घूमजाव केले होते. आता रामदेवबाबांनी अॅलोपथीच्या (Allopathy) औषधांबाबत नवा वाद ओढवून घेतला आहे. याचवेळी पतंजलीच्या डेअर व्यवसायाचे प्रमुख सुनील बन्सल (वय 57) यांचा कोरोनामुळे (Covid-19) मृत्यू झाला आहे.
बन्सल डेअरी सायन्सेसमधील तज्ञ होते. त्यांनी 2018 मध्ये पतंजलीच्या डेअरी व्यवसायाची धुरा हाती घेतली होती. त्यावेळी कंपनीने गाईचे पॅकेज्ड दूध, दही, ताक आणि चीजसह इतर दुग्ध उत्पादने बाजारात आणण्याची घोषणा केली होती. बन्सल यांच्या मागील आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांची फुफ्फुसे निकाली झाली होती. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. बन्सल हे काही दिवस ईसीएमओवर होते. ईसीएमओ म्हणजे एक्स्ट्राकॉर्पोरल मेंम्ब्रेन ऑक्सिजनेशन मशिन होय. ही मशिन रुग्णाच्या हृदय आणि फुफ्फुसे बंद पडल्यानंतर त्यांचे कार्य करते, असे वृत्त 'द प्रिंट'ने दिले आहे.
दरम्यान, योगगुरू रामदेवबाबा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. व्हॅाट्स अॅपरील एका मेसेज वाचून दाखवताना त्यांनी अॅलोपॅथी उपचार पध्दतीला फालतू म्हटले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॅा. हर्षवर्धन यांनीही त्यावर नाराजी व्यक्त करत खरमरीत पत्र लिहिलं आहे. यामुळे अखेर रामदेवबाबांनी माफीही मागितली आहे.
रामदेवबाबा अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून अडचणी आले आहे. नुकत्याच एका शिबीरामध्ये त्यांनी अॅलोपॅथीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. व्हॅाट्स अॅप मेसेज वाचून दाखवताना त्यांनी लाखो लोक अॅलोपॅथीच्या औषधांमुळं मरत आहेत, असं वक्तव्य केलं. तसेच कोरोनाबाधित रुग्णांना तापासाठी दिल्या जाणाऱ्या फॅबिफ्लू या औषधालाही फालतू म्हटलं. रामदेव बाबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आयएमएने त्यावर आक्षेप घेतला.
आयएमएने रामदेव बाबांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जात होती. अखेर डॅा. हर्षवर्धन यांनी रामदेव बाबांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे. 'संपूर्ण देशवासियांसाठी कोरोना काळात दिवस-रात्र लढणारे डॅाक्टर आणि आरोग्य कर्मचारी देवासमान आहेत. रामदेव बाबांच्या वक्तव्याने त्यांचा अपमान झाला असून देशवासियांच्या भावनाही दुखावल्या आहेत. त्यामुळे आपले वादग्रस्त वक्तव्य मागे घ्यावे, असे आवाहन हर्षवर्धन यांनी केलं आहे.
अॅलोपॅथी औषधे आणि डॅाक्टरांवरील तुमचे वक्तव्याने देशवासियांना दु:ख झाले आहे. या भावना फोनवरून आपल्यापर्यंत पोहचवल्या आहेत. तुम्ही काल आपल्या वक्तव्याबाबत जो खुलासा केला आहे, तो पुरेसा नाही. कोरोना काळात अॅलोपॅथी आणि संबंधित डॅाक्टरांनी कोट्यवधी लोकांना जीवनदान दिले आहे. त्यामुळं अॅलोपॅथी औषधांमुळं लाखो लोकांचा जीव गेला, असं म्हणने अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. अॅलोपॅथी पध्दतीला तमाशा, फालतू म्हणनेही खूप खेदजनक आहे, असे पत्रात नमूद केलं आहे.
Edited Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.