राज्य संपूर्ण लॉकडाउनच्या दिशेने; दूध, भाजीपाला, किराणा दुकाने सकाळी फक्त 4 तास खुली

राज्यात निर्बंध लागू करुनही मोठ्या प्रमाणात नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. यामुळे सरकारने हे निर्बंध आणखी कडक केले आहेत.
grocery stores in maharashtra will open for four hours in morning
grocery stores in maharashtra will open for four hours in morning

मुंबई : कोरोनाला अटकाव करण्यासाठी 5  ते 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. आता सरकारने हे निर्बंध आणखी कडक केले आहेत. आता भाजीपाला, किराणा आणि दूध दुकाने सकाळी 7 ते 11 याच वेळेत सुरू राहतील. याचबरोबर आणखी काही निर्बंध वाढवण्याचा विचार राज्य सरकार करीत असून, राज्याची वाटचाल आता संपूर्ण लॉकडाउनतच्या दिशेने सुरू झाली आहे.  

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना टोपे म्हणाले की, सरकार आणखी निर्बंध वाढवण्याचा विचार करीत आहे. किराणा, फळे, भाजीपाला आणि दूध यासह इतर आवश्यक वस्तू विकणारी दुकाने आता सकाळी 7 ते 11 या चार तासातच खुली राहतील. 

राज्यात निर्बंध लागू करुनही मोठ्या प्रमाणात नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. लोक किराणा, दूध आदी वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली दिवसभर फिरत असल्याचे चित्र आहे. आवश्यक वस्तूंची दुकाने सकाळी चार तास खुली ठेवण्याचा आदेश लवकरच काढण्यात येईल. हा आदेश राज्य सरकारच्या पातळीवर काढला जाईल आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर हा आदेश काढला जाणार नाही. दुकानदारांना या नियमांचे पालन करावे लागेल, असे टोपे यांनी सांगितले. 

दोन दिवसांत आणखी निर्बंध? 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत अनेक तज्ञांशी चर्चा करीत आहेत. राज्यातील निर्बंध आणखी वाढवण्याचा निर्णय ते दोन दिवसांत घेण्याची शक्यता आहे. राज्यात मागील 24 तासांत 58 हजार 924 रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूम रुग्णसंख्या 38 लाख 98 हजार 262 वर पोचली असून, एकूण मृत्यू 60 हजार 284 आहेत. 

राज्यात सध्या 'ब्रेक द चेन'अंतर्गत शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच आहे. मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद आहेत. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येत.

राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे.  सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. तसेच, रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येत नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.  
 
बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद आहेत.दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते. किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com