आझाद, वासनिक अन् शर्मा यांच्याकडून पक्षाने आता घेतले लेखी...

काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक वादळी ठरली असून, पक्षाच्या अध्यक्षपदाचा मुद्दा सोडून इतर मुद्द्यावरुनच ही बैठक गाजली आहे. आता पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी याच कायम राहिल्या आहेत.
ghulam nabi azad, mukul wasnik, anand sharma has given writing to congress party
ghulam nabi azad, mukul wasnik, anand sharma has given writing to congress party

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक आज अपेक्षेप्रमाणे वादळी ठरली. बैठकीतील इतर विषयांपेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित विधानावरुन मोठा गदारोळ उडाला. राहुल गांधी असे काही बोललेच नसल्याचा खुलासा पक्षाने केला आहे. कार्यकारी समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार आता सोनिया गांधी याच पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. पुढील सहा महिन्यांत नवीन अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. दरम्यान, पक्ष नेतृत्व बदलण्यासाठी पत्र लिहिणारे गुलाम नबी आझाद, मुकूल वासनिक आणि आनंद शर्मा यांच्याकडून पक्षाने आता लेखी घेतले आहे. 

काँग्रेस कार्यकारी समितीची अतिशय महत्वाची बैठक आज झाली. काँग्रेसच्या वीसहून अधिक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली होती. याचबरोबर त्यांनी पक्षातील रचनात्मक सुधारणांचा मुद्दा उपस्थित करुन पक्षाची स्थिती आणि दिशा याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याचबरोबर त्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीची निवडणूक घेण्याची मागणी केली होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या व्हर्च्युअल बैठकीला सोनिया गांधी, डॉ.मनमोहनसिंग, राहुल गांधी, प्रियांका गांधी वद्रा, अमरिंदरसिंग, मल्लिकार्जुन खर्गे, पी.एल.पुनिया, के.सी.वेणूगोपाल आणि ए.के.अँटनी यासह अन्य नेते या बैठकीला उपस्थित होते. आजच्या बैठकीत हंगामी अध्यक्षपदावरुन मुक्त करण्याची विनंती सोनिया गांधी यांनी समितीच्या सदस्यांनी केली. यावर मनमोहनसिंग आणि ए.के.अँटनी यांनी नवीन अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया यांनीच अध्यक्षपदी राहावे, असे सुचवले.

काँग्रेस नेत्यांच्या पत्राच्या मुद्द्यावरुन पक्षात दोन गट पडले आहेत. गांधी कुटुंबाचे निष्ठावंत आणि काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. सोनिया यांनीच अध्यक्षपदी राहावे अथवा राहुल यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोनिया गांधी यांनी 10 ऑगस्ट 2019 रोजी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. 

पक्षातील नेतृत्व बदलाबाबत पत्र लिहिणारे नेते हे भाजपशी संगनमत करीत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी या बैठकीत केल्याची चर्चा सुरू झाली होती. राजस्थानमध्ये पक्षासमोर निर्माण झालेले संकट, सोनिया गांधी रुग्णालयात दाखल असतानाची नेमकी वेळ पत्रासाठी निवडण्यात आली, असे राहुल गांधी म्हणाल्याचीही चर्चा होती. अखेर पक्षाने राहुल गांधी असे काहीच बोलले नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती काँग्रेस नेते के.एच. मुनियप्पा यांनी दिली. ते म्हणाले की. पक्षाच्या नेृत्वत्वाच्या मुद्द्यावरुन कोणतेही मतभेद नाहीत. गुलाम नबी आझाद, मुकूल वासनिक आणि आनंद शर्मा यांनी नेतृत्वाबाबत कोणतेही मतभेद नसल्याचे लेखी दिले आहे. सर्व सदस्यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविला आहे. कार्यकारी समितीने एकमताने हा निर्णय घेतला आहे. 

सोनिया यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी विनंती राहुल गांधी यांनीही केली होती. अखेर सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष म्हणून राहण्यास संमती दर्शविली आहे. नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष असतील. पुढील सहा महिन्यांत पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड होईल. यासाठी पुढील बैठक लवकरच बोलावण्यात येईल, असे कार्यकारी समितीचे सदस्य पी.एल. पुनिया यांनी सांगितले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com