भाजपच्या जास्त जागा आल्या तरी आमचे नेते नितीशकुमारच; नड्डांचा जाहीर शब्द

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला आहे. याचबरोबर आघाड्यांमधील कुरबुरीही समोर येऊ लागल्या आहेत.
Even if we get more seats Nitish Kumar will still be our leader says BJP president J P Nadda
Even if we get more seats Nitish Kumar will still be our leader says BJP president J P Nadda

पाटणा : बिहारमध्ये संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजप यांची सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. जेडीयू आणि भाजपमध्ये कुरबुरी सुरू झाल्याचे चित्र दिसत होते. यावर अखेर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पडदा टाकला आहे. भाजपच्या जागा जास्त आल्या तरी आमचे नेते नितीशकुमारच असतील, असा जाहीर शब्द नड्डा यांनी दिला आहे.   

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

बिहारमधील हाजीपूरमध्ये नड्डा यांनी आज प्रचार केला. या वेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावत घटक पक्षांच्या नाराजीबद्दल थेट वक्तव्य केले. ते म्हणाले की, भाजप, जेडीय, हम आणि व्हीआयपी हे पक्ष एकत्रितरीत्या दोन तृतीयांश जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवतील. जनतेला लालूंचे कुशासन आणि नितीशकुमारांचे सुशासन आठवत आहे. येथील जनतेला विकास हवा आहे. भाजपच्या या निवडणुकीत जास्त जागा आल्या तरी मुख्यमंत्री नितीशकुमारच असतील. 

विरोधकांवर हल्लाबोल करताना नड्डा म्हणाले की, जनतेला राष्ट्रीय जनता दलाबद्दल (आरजेडी) पुरेपूर माहिती आहे. त्यांच्या  काळातील जंगलराज जनतेने पाहिला आहे. आता त्यांनी विनाशकारी डाव्या पक्षांशी हातमिळवणी केली आहे. याचबरोबर सध्या पाकिस्तानचा प्रवक्ता बनलेला काँग्रेस पक्षही त्यांच्यासोबत आहे. बिहारमधील जनतेला या पक्षांना त्यांची जागा दाखवून देईल. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com