भाजपच्या मोफत कोरोना लशीला निवडणूक आयोगाची 'क्लिनचिट'

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जनतेला मोठमोठी आश्वासने देण्यावर भर दिला जात आहे.
election commission gives clean chit to bjp for promising free covid19 vaccine in bihar
election commission gives clean chit to bjp for promising free covid19 vaccine in bihar

नवी दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कोरोनाच्या मोफत लशीचे आश्‍वासन दिले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. निवडणुकीत अशा प्रकारचे आश्वासन देणे हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी आता निवडणूक आयोगाने भाजपला क्लिनचिट दिली आहे. दरम्यान, काँग्रेसलाही अशाच एका आश्वासनप्रकरणी मागील लोकसभा निवडणुकीत क्लिनचिट दिल्याचा दाखलाही आयोगाने दिला आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी मोफत लशीच्या आश्वासनावरुन निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाने आज त्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. आयोगाने आचारसंहितेतील ३ कलमांचा उल्लेख केला आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात कोणतेही प्रतिकूल आश्‍वासन असू नये, निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य व गांभीर्य यांचा भंग होईल व मतदारांवर प्रत्यक्ष प्रभाव पडेल असा मुद्दा त्यात नसावा आणि पूर्ण करता येतील अशीच आश्‍वासने जनतेला दिली पाहिजेत. या तिन्ही कसोट्यांवर भाजपचे लशीचे आश्‍वासन चुकीचे ठरत नाही, असे आयोगाने म्हटले आहे. 

निवडणूक आयोगाच्या या क्लिनचिटमुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यातील ११ मुद्द्यांमध्ये बिहारी जनतेला कोरोनाची प्रस्तावित लस मोफत देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याला विरोधकांना आक्षेप घेतला होता. भाजपने, मात्र हा आरोप फेटाळून लावले होते.

याआधी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या ‘न्याय’ योजनेलाही आयोगाने योग्य ठरविले होते. याचाही दाखला आयोगाने दिला आहे. काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘न्याय’ योजनेचे आश्‍वासन दिले होते. त्यात २५ कोटी लोकांना दरमहा प्रत्येकी 6 हजार रुपये किंवा वर्षाला ७२ हजार रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. याविरोधात भाजपने केलेली तक्रार आयोगाने ५ मे २०१९ रोजी फेटाळून लावली होती. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. याचवेळी एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com