काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मुहूर्त दोन वर्षांनंतर पुन्हा हुकला...

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तिढा अद्याप कायम असून, तो लवकर सुटण्याची शक्यता मावळली आहे.
congress working committee postpones party president election
congress working committee postpones party president election

नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाचा (president) तिढा अद्याप कायम असून, तो लवकर सुटण्याची शक्यता मावळली आहे. याआधी अध्यक्षपदासाठी जून महिन्यात निवडणूक घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. परंतु, पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यासाठी आता कोरोना (Covid19) महामारीचे कारण देण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षांपासून काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळत नसल्याचे चित्र आहे. 

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दोन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत  जानेवारी महिन्यात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीत अध्यक्षपदाची निवडणूक जून महिन्यात घेण्याचा निर्णय झाला होता. 

काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक आज झाली. यात 23 जूनला होणारी अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने या निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी 7 जून ही अंतिम तारीख निश्चित केली होती. परंतु, ही तारीख उलटून दोन दिवस झाल्यानंतर काँग्रेसने अखेर निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. कोरोना संकटामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे कार्यकारी समितीने म्हटले आहे. 

मागील लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता. शेवटी सोनिया गांधी यांनाच पुन्हा हंगामी अध्यक्ष म्हणून काम सुरू करावे लागले. पक्षाला अद्याप पुर्णवेळ अध्यक्ष न मिळाल्याने काही नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. सतत बैठका होऊनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत मरगळ दिसून येत आहे. 

गेल्या वर्षी पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पत्र पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिले होते. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली कपिल सिब्बल, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. या पत्राने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर पक्षाची तातडीची बैठक घेऊन या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले होते. या नेत्यांचे समाधान झाल्याचा दावा अन्य नेत्यांकडून करण्यात आला होता पण त्यानंतरही पक्ष नेतृत्वामध्ये बदल झाला नव्हता. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com