नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करावा, यासाठी पक्षाच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचे कान टोचले होते. आता पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर या 23 नेत्यांच्या गटाने पुन्हा एकदा पक्षाला जुन्या गोष्टींची आठवण करुन दिली आहे. यावर काँग्रेसने अखेर अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्यासोबत पक्ष संघटनेची फेररचना करावी, अशी मागणी करणारे पत्र 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. या नेत्यांनी उघडपणे बंडाची भाषा केल्याची टीका पक्षातूनच त्यांच्यावर करण्यात आली होती. यावर पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक होऊन पक्ष संघटनेत तातडीने फेरबदल करण्याचा निर्णय झाला होता. याचबरोबर तळापासून संघटनेत निवडणुका घेण्याचेही ठरले होते. मात्र, पक्षाने कोणतीही पावले अद्याप उचललेली नाहीत.
काँग्रेसमधील नाराजी व्यक्त करणाऱ्या नेत्यांमध्ये कपिल सिब्बल यांच्यासह 23 नेत्यांचा समावेश होता. या 'जी 23' नेत्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये आज झालेल्या शांती संमेलनात सहभाग घेतला. या वेळी माजी खासदार गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, राज्यसभा खासदार विवेक तंखा, लोकसभा खासदार मनीष तिवारी आणि हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा आदी उपस्थित होते.
राहुल गांधी हे प्रचारासाठी तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. राहुल यांनी नुकताच दक्षिण आणि उत्तर असा नवा वाद निर्माण केला आहे. नेमके ते तमिळनाडूच्या दौऱ्यावर असतानाच मुहूर्त या शांती संमेलनासाठी काढण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. या संमेलनात गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसने संसदेतून मुक्त केल्याबद्दल अनेक नेत्यांनी जाहीरपणे दु:ख व्यक्त केले.
यावर काँग्रेसने अखेर अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, जम्मूत सभेला उपस्थिती लावणाऱ्या सर्वच नेत्यांबद्दल पक्षाला आदर आहे. ते सर्व नेते सन्माननीय आणि पक्षाचे नावाजलेले नेते आहेत. ते आमच्या पक्षात असल्याचा आम्हाला अभिमान आहे. मला असे वाटते की काँग्रेसचे सदस्य असल्याचा त्यांनाही अभिमान वाटत असावा. त्यामुळे ते काँग्रेसच्या कुटुंबातील सदस्यच आहेत.
या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुका ज्या राज्यांत आहेत तेथे या नेत्यांनी प्रचार केला असता तर काँग्रेस आणखी भक्कम झाली आहेत. मी या नेत्यांचा आदर ठेवून सांगते की त्यांनी सक्रियपणे पक्षाचे काम केल्यास ते त्यांचे सर्वांत मोठे योगदार ठरेल. त्यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत पक्षाच्या प्रचार मोहिमेत सहभागी व्हायला हवे, असे सिंघवी यांनी म्हटले आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.