नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकारी समितीची नुकतीच झालेली बैठक वादळी ठरली होती. कार्यकारी समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार आता सोनिया गांधी याच पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. पुढील सहा महिन्यांत नवीन अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. पक्ष नेतृत्वात बदलासाठी पत्र लिहणारे 23 नेते वादाच्या केंद्रस्थाना राहिले होते. आता राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, पक्ष नेतृत्वाला पत्र लिहिणाऱ्या एका नेत्याने राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काँग्रेस कार्यकारी समितीची अतिशय महत्वाची बैठक नुकतीच झाली. काँग्रेसच्या वीसहून अधिक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली होती. याचबरोबर त्यांनी पक्षातील रचनात्मक सुधारणांचा मुद्दा उपस्थित करुन पक्षाची स्थिती आणि दिशा याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याचबरोबर त्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीची निवडणूक घेण्याची मागणी केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हर्च्युअल बैठकीला सोनिया गांधी, डॉ.मनमोहनसिंग, राहुल गांधी, प्रियांका गांधी वद्रा, अमरिंदरसिंग, मल्लिकार्जुन खर्गे, पी.एल.पुनिया, के.सी.वेणूगोपाल आणि ए.के.अँटनी यासह अन्य नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत हंगामी अध्यक्षपदावरुन मुक्त करण्याची विनंती सोनिया गांधी यांनी समितीच्या सदस्यांनी केली होती. यावर मनमोहनसिंग आणि ए.के.अँटनी यांनी नवीन अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया यांनीच अध्यक्षपदी राहावे, असे सुचवले.
काँग्रेस नेत्यांच्या पत्राच्या मुद्द्यावरुन पक्षात दोन गट पडले आहेत. गांधी कुटुंबाचे निष्ठावंत आणि काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. सोनिया यांनीच अध्यक्षपदी राहावे अथवा राहुल यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोनिया गांधी यांनी 10 ऑगस्ट 2019 रोजी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता.
पक्षातील नेतृत्व बदलाबाबत पत्र लिहिणारे नेते हे भाजपशी संगनमत करीत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी या बैठकीत केल्याची चर्चा सुरू झाली होती. राजस्थानमध्ये पक्षासमोर निर्माण झालेले संकट, सोनिया गांधी रुग्णालयात दाखल असतानाची नेमकी वेळ पत्रासाठी निवडण्यात आली, असे राहुल गांधी म्हणाल्याचीही चर्चा होती. अखेर पक्षाने राहुल गांधी असे काहीच बोलले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार पक्षाला पत्र लिहिणाऱ्या एका नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर या पत्रामागील भूमिका स्पष्ट केली आहे. या नेत्याने म्हटले आहे की, लोकसभेच्या 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला गरजेपुरत्याही जागा मिळाल्या नाहीत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची पिछेहाट होत आहे. यामुळे राहुल गांधी यांनी नेृतत्व केल्यास ते पक्षाला 2024 मध्ये 400 जागा मिळवून देऊ शकत नाहीत. देशाच्या जवळपास अर्ध्या असलेल्या उत्तर भागात पक्षाचे केवळ 16 खासदार आहेत. यातील निम्मे म्हणजेच 8 हे पंजाबमधील आहेत. आपण भारतात राहत आहोत, हे वास्तव सर्वांना स्वीकारायला हवे. आम्ही पक्षाच्या भल्यासाठीच भूमिका घेत आहोत. यामुळे या प्रकरणी पक्षासमोर हा मुद्दा मांडला आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.