बिहारमध्ये डबल इंजिन सरकार नको; चिराग पासवानांचे भाजपला साकडे

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील आघाड्यांचे गणित बनण्यापेक्षा बिघडतानाच दिसत आहे. यामुळे सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.
chirag paswan says bjp should not consider double engine sarkar in bihar
chirag paswan says bjp should not consider double engine sarkar in bihar

नवी दिल्ली : बिहारमधील सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजप अडचणीत आले आहेत. या प्रकरणी एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी घेतलेल्या भूमिकेप्रमाणे भाजपने कृती करावी, असे आवाहन केले आहे. 

या पार्श्वभूमीवर एलजेपीच्या नेत्यांची बैठक काल पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रामविलास पासवान या वेळी उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीनंतर पक्षाने निवेदन जाहीर केले. यात म्हटले होते की, राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत आमची भक्कम आघाडी आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर आमचे जेडीयूसोबत वैचारिक मतभेद आहेत. यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीनंतर आमचे विजयी उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गावर भाजपसोबत असतील. 

चिराग यांच्या पवित्र्यामुळे बिहारमध्ये एनडीए अडचणीत आली आहे. त्यांनी जेडीयूला विरोध आणि भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेऊन एनडीएची कोंडी केली आहे. याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी चिराग यांच्याशी आज चर्चाही केली होती. मात्र, चिराग यांनी नितीशकुमारांच्या नेतृत्नाखाली निवडणूक लढवण्यास साफ नकार दिला आहे. 

याविषयी बोलताना चिराग पासवान यांनी मोदींचे कौतुक केले असून, नितीशकुमार यांचा नामोल्लेख न करता जेडीयूला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मोदींनी आधी डबल इंजिन सरकार नको, अशी जाहीर भूमिका घेतली होती. या भूमिकेचे अनुसरण योग्य पद्धतीने करायला हवे. त्यांचे हे धोरण प्रत्यक्षात राबवायला हवे. यासाठी भाजपने आता कृती करायला हवी.

बिहारमध्ये जेडीयूच्या उमेदवार ज्या मतदारसंघात असेल तेथे विरोधात एलजेपी उमेदवार देणार आहे. मात्र, राज्यात भाजपचा उमेदवार असेल तेथे विरोधात उमेदवार न देता पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार बनावे, असे एलजेपीने म्हटले आहे. एलजेपीने आता विरोध केला असला तरी निकालानंतर  भाजपसोबत जाण्याचे सूतोवाच केले आहे. एलजेपीच्या या भूमिकेमुळे नितीशकुमार  आणि भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com