बिहारमध्ये कधीही विधानसभा निवडणुका लागू शकतात; चिराग पासवानांचा खळबळजनक दावा

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असली तरी राजकीय गदारोळ मात्र, संपलेला नाही. आता चिराग पासवान यांनी पुन्हा निवडणुका होण्याचे भाकित केले आहे.
chirag paswan says assembly election will be held in bihar at any time
chirag paswan says assembly election will be held in bihar at any time

पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी भाजपने सुशीलकुमार मोदींची उमेदवारी जाहीर केली आहे. यावर लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी या जागेवर भाजपचाच अधिकार असल्याचे म्हटले आहे. याचवेळी राज्यात कधीही विधानसभा निवडणुका लागू शकतात त्यामुळे तयारीला लागा, असा आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस, डावे यांची महाआघाडी असे चित्र होते. एनडीने 125 जागा मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला. याचवेळी महाआघाडीने 110 जागा मिळवल्या होत्या. 

चिराग पासवान यांनी राज्यात एनडीएशी फारकत घेत राष्ट्रीय पातळीवर भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी नितीशकुमार यांच्या जेडीयूच्या काही जागा कमी करण्यात यश मिळवले होते. पासवान हे सतत नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक करीत होते. त्यांची भाजपशी छुपी युती असल्याचीही चर्चा होती. मात्र, निवडणूक संपल्यानंतर भाजपने पासवान यांचा मोठा झटका दिला आहे. 

लोक जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांच्या निधनानंतर बिहारमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगाने काढली आहे. या जागेवर भाजपने सुशीलकुमार मोदींना त्यांचा उमेदवारी दिली आहे. भाजपने एकाच वेळी मोदींचे पुनर्वसन आणि चिराग पासवान यांना झटका देण्याची चाल खेळली आहे. यामुळे पासवान यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 3 डिसेंबर  आहे. या जागेसाठी 14 डिसेंबरला मतदान असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 

रामविलास पासवान यांच्यानंतर निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर त्यांच्या पत्नी निवडणूक लढतील, अशी शक्यता होती. आता भाजपने सुशीलकुमार मोदींचे नाव या जागेवर पुढे केले आहे. यामागे मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्यामुळे जेडीयूला मोठा फटका बसला आहे. याचा वचपा काढण्यासाठी नितीशकुमार यांनीच यासाठी भाजपवर दबाव आणल्याची चर्चा आहे. 

ती राज्यसभेची जागा भाजपचीच होती. त्यांनीच त्या जागेवर कोणाला लढवायचे याचा निर्णय घ्यायचा आहे, असे चिराग पासवान यांनी स्पष्ट केले. या वेळी कार्यकर्त्यांना त्यांनी बिहारमध्ये कधीही विधानसभा निवडणुका लागू शकतात त्यामुळे तयारीला लागा, असा आदेश दिला. 

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com