नवी दिल्ली : देशभरात आता कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडेही विक्रमी पातळीवर पोचले आहेत. देशात कोरोना लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लशीची टंचाई निर्माण झाली असून, लसीकरण बंद करण्यात आले आहे. आता केंद्र सरकारने लशीचे वाटप केले असून, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असताना सर्वांत जास्त लशी मात्र, भाजपची सत्ता असलेल्या राज्यांना मिळाल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुढील काही दिवसांचे लसवाटप जाहीर केले आहे. यानुसार, एकूण साडेतीन कोटी डोसचे वाटप करण्यात आले आहे. सर्वांत जास्त लशी मिळालेल्या पहिल्या पाच राज्यांमध्येही महाराष्ट्राचा समावेश नाही. पहिल्या पाच राज्यांमधील चार राज्ये भाजपची सत्ता असलेली उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाना ही आहेत. याचबरोबर पाचव्या स्थानी विधानसभा निवडणूक सुरू असलेल्या पश्चिम बंगालच्या समावेश आहे.
राज्यनिहाय लसवाटप
१) उत्तर प्रदेश : ४४.९८ लाख
२) मध्य प्रदेश ३३.७६ लाख
३) कर्नाटक : २९.०६ लाख
४) हरियाना : २४ लाख
५) पश्चिम बंगाल : २१ लाख
६) महाराष्ट्र : १७.४३ लाख
७) गुजरात : १७.५७ लाख
महाराष्ट्राला मिळालेला लशीचा साठा अपुरा असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. टोपे म्हणाले की, आम्हाला कोणत्याही अडथळ्याविना लसीकरण सुरु ठेवायचे असेल तर आठवड्याला ४० लाख डोस लागतील. आम्हाला मिळालेला १७ लाख ४३ हजार डोस कमी आहेत. राज्यातील लशीचा साठा संपत चालला आहे. या डोसमधून भागवाभागव करण्याचा मोठा प्रश्न आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वच प्रौढ नागरिकांना कोरोना लस द्यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. यावर आरोग्य मंत्रालयाने लशीचा तुटवडा असल्याचे कारण देत गरज असेल त्यांनाच प्रथम लस देण्याची भूमिका घेतली आहे. वेळ आल्यानंतर सर्वांना लस देण्यात येईल, असेही म्हटले होते.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे लशीची नुकतीच मागणी केली होती. राज्यातील लशीचा साठा संपत आल्याची माहितीही त्यांनी दिली होती. गोंदिया, अकोला, यवतमाळ आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये केवळ एक दिवस पुरेल एवढाच साठा आहे. सातारा जिल्ह्यातील लशीचा साठा संपला असून, लस देणे बंद करण्यात आले आहे. दुसऱ्या डोससाठी येणाऱ्या अनेकांना लस न घेता परतावे लागत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसू लागले आहेत.
अशावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन हे मात्र, राज्यांवर खापर फोडत आहेत. पुरेसा साठा असल्याचे केंद्र सरकार सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अनेक राज्यांनी लशीचा तुटवडा असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मात्र, याचा संदर्भ महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी जोडून राजकारण करीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भाजपशासित उत्तर प्रदेशातील नोएडा आणि गाझियाबादमध्येही लशीची टंचाई होती. भाजपचेच सरकार असलेल्या उत्तराखंडनेही लशीचा साठा संपत आल्याचे सांगत आणखी दहा लाख डोसची मागणी केली होती. असे असतानाही केंद्रीय आरोग्यमंत्री छातीठोकपणे एकाही राज्यात कोरोना लशीची टंचाई नसल्याचा दावा करीत होते. यामुळे लशीच्या टंचाईवरुन आगामी काळात केंद्र विरुद्ध राज्ये असा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.