धक्कादायक : हाथरसमध्ये भाजप नेत्याच्या घरी सवर्णांची मोठी बैठक

हाथरस येथील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात मोठा गदारोळ सुरू आहे. या प्रकरणावरुन उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. भाजपच्या माजी आमदाराने या प्रकरणी सवर्णांची मोठी बैठक घेतली आहे.
 Caste based meet held at former BJP MLAs home at hathras
Caste based meet held at former BJP MLAs home at hathras

लखनौ : हाथरस येथील दलित मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणावरुन देशभरात वातावरण पेटले आहे. या मुद्द्यावर उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार तोंडघशी पडले आहे. यामुळे राज्य सरकारने अखेर या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवली आहे. आता पीडितेच्या गावापासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावर भाजप नेत्याने त्याच्या निवासस्थानी सुमारे सातशे ते आठशे सवर्णांची बैठक आज घेतली. विशेष म्हणजे जमावबंदीचा आदेश असतानाही कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही बैठक झाली आहे.  

हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

योगी आदित्यनाथ या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीअंती हाथरसचे पोलीस अधीक्षक (एसपी), उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. 

पीडितेच्या कुटुंबीयांना हाथरसचे जिल्हाधिकारी पी.के.लक्सकर यांनी धमकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी लावून धरली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली तपास करावा आणि हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना हटवावे, अशी दोन मागण्या पीडितेच्या कुटुंबीयांनी सरकारकडे केल्या आहेत. अद्याप सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही. 

आता भाजपचे माजी आमदार राजवीरसिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी सवर्णांची बैठक आज बोलावली होती. हाथरसमध्ये जमावबंदी आदेश असून, पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र जमण्यास मनाई आहे. तरीही या बैठकीला सुमारे सातशे ते आठशे सवर्ण उपस्थित होते. या बैठकीसाठी राजवीरसिंह यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राजवीरसिंह यांच्या पुत्र महावीरसिंह यांनी मात्र, केवळ सवर्णांची नव्हे तर समाजातील सर्व घटकांची बैठक होती, असा दावा केला आहे. 

महावीरसिंह म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले असून, त्याचे आम्ही स्वागत करतो. आमचा तपास यंत्रणांवर विश्वास आहे. पीडितेच्या कुटुंबीय वारंवार भूमिका बदलत आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी हे सर्व सुरु आईआहे. या प्रकरणाती आरोपी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. मात्र, पीडितेचे कुटुंबीय नार्को चाचणी आणि सीबीआय चौकशीला नको म्हणत आहेत. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी घरातून पकडण्यात आले आहे. ते दोषी असते तर पळून गेले असते. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष पीडितेच्या कुटुंबीयांना फूस लावत आहेत.  

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com