शशिकलांच्या अचानक झालेल्या राजकीय एक्झिटमागे भाजपचाच हात!
चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांच्या चार वर्षानंतर झालेल्या पुनरागमनानंतर तमिळनाडूत राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू लागली होती. आता अचानक शशिकलांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती जाहीर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांच्या या राजकीय एक्झिटमागे भाजपचाच हात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शशिकला यांना अण्णाद्रमुकमध्ये परत घ्यावे, यासाठी मुखमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांच्यावर भाजपकडून दबाव आणला जात होता. कारण, शशिकलांनी वेगळी चूल मांडल्यास त्याचा फटका अण्णाद्रमुकलाच बसणार होता. मात्र, पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम हे दोघे ऐकत नाहीत हे पाहून भाजपने शशिकलांवर लक्ष केंद्रित केले. शशिकलांनाच अखेर माघार घेण्यास सांगण्यात आले. शशिकलांनी माघार घेण्यास होकार दिला, पण त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध दाखल असलेल्या सक्त वसुली संचालनालय (ईडी) आणि प्राप्तिकर विभागाच्या (आयटी) विविध खटल्यांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. भाजने याबाबत होकार दर्शवल्यानंतर शशिकलांनी अखेर माघारीचा निर्णय घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जयललिता जिवंत असतानाही शशिकलांनी कधीही कोणतेही पद स्वीकारले नव्हते. त्यामुळे त्यांना ही प्रतिमा जपण्याची आयती संधी चालून आली आहे. पक्षाची एकजूट करण्यात शशिकला या मोठी भूमिका या आता बजावू शकतील. अण्णाद्रमुकने सत्ता कायम राखल्यास शशिकलांचे राजकीय वजन राजकीय निवृत्तीनंतरही वाढणार आहे. याचवेळी अण्णाद्रमुक निवडणूक हरल्यास त्यांनी पुन्हा पक्षाचे नेतृत्व करावे, अशी मागणी जोर धरु शकते. त्यामुळे शशिकलांनी उचललेले हे पाऊल त्यांच्यासाठी फायद्याचे ठरण्याची शक्यता आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
शशिकला यांनी चेन्नई न्यायालयामध्ये मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह अण्णाद्रमुक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात नव्याने अर्ज केला होता. शशिकला या पक्षाच्या सरचिटणीस होत्या, पण २०१७ मध्ये त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यावेळीच शशिकला यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. आता त्यांनी या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार १५ मार्चला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
चार वर्षाची शिक्षा भोगून शशिकला काही दिवसांपूर्वीच राज्यात परतल्या आहेत. त्यामुळे सरकारमध्ये मोठी अस्वस्थता आहे. शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली होती. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे होती. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला होता. मुमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली होती. आता शशिकलांनी निवृत्तीची घोषणा करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.