अर्णब गोस्वामी प्रकरणात भाजप नेत्यांचे मौन...काय आहे नेमकं कारण?

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी हे बनावट टीआरपी प्रकरणात चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणातभाजपची कोंडी झाली आहे.
bjp ministers and leaders silent on arnab goswami whatsapp chat controversy
bjp ministers and leaders silent on arnab goswami whatsapp chat controversy

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरुन केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. मात्र, या प्रकरणी प्रतिवाद करण्यास भाजप सरकारमधी मंत्री आणि नेते मैदानात उतरत नसल्याचे चित्र आहे. पक्षानेच गोस्वामी प्रकरणात न बोलण्याची नेत्यांना सूचना केली असल्याचे समजते. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयचा वापर व्यवसायाच्या वाढीसाठी केल्याचे समोर आले आहेत. गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातील स्वत:च्या वजनाचा अभिमानाने उल्लेख केला आहे. 

गोस्वामी प्रकरणात भाजप सरकारची कोंडी झाली आहे. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून चौकशीची मागणी केली आहे. या सर्व गदारोळात प्रतिवाद  करण्यास भाजप नेते मैदानात उतरत नसल्याचे चित्र आहे. चॅटमध्ये अनेक मंत्र्यांच्या नावाचा थेट उल्लेख असला तरी तेही याबाबत बोलण्यास तयार नसल्याचे दिसते. गोस्वामींच्या चॅटमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचाही उल्लेख होता. मात्र, त्यांनीही याप्रकरणी प्रतिवाद केलेला नाही. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने प्रवक्ते आणि नेत्यांना अर्णब गोस्वामी प्रकरणी न बोलण्याच्या सूचना केल्या आहेत. काही ज्येष्ठ नेत्यांनी तर या संपूर्ण प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र, या पुढील काळात गोस्वामी यांच्यापासून भाजप दोन हात अंतर राखेल, अशी भूमिकाही एका नेत्याने घेतली आहे. 

गोस्वामींच्या चॅटमध्ये केंद्रीय पर्यावरण व माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचाही उल्लेख होता. काही दिवसांपूर्वी कृषी कायद्यांसंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत जावडेकर यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी पत्रकार परिषदेचा विषय वेगळा आणि तुम्ही विचारत असलेला विषय वेगळा असल्याची टोलवाटोलवी केली होती. याचबरोबर तुम्ही मंत्रालयात या मग चर्चा करु, असेही पत्रकारांना सांगितले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com