पाटणा : बिहारमध्ये कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असा बॉम्ब लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी टाकला आहे. यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. भाजपने उपमुख्यमंत्रिपदासाठी डावललेले सुशीलकुमार मोदी यांनी मात्र, सरकार स्थिर असल्याचा दावा केला आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस, डावे यांची महाआघाडी असे चित्र होते. एनडीने 125 जागा मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला. याचवेळी महाआघाडीने 110 जागा मिळवल्या होत्या.
राज्यात राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. दुसऱ्या क्रमांकावर 74 जागांसह भाजप होता. जेडीयूला 43 जागा मिळाल्या असून, काँग्रेसला 19 जागा आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. नितीश यांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर भाजपने नितीशकुमार यांचेच नाव पुढे केले होते.
राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, असे चिराग पासवान यांनी पक्षाच्या मेळाव्यात सांगितले आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असा आदेशही त्यांनी दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मध्यावधीच्या शक्यतेबाबत भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, राज्यातील सरकारला कोणीही धक्का लावू शकत नाही. या निवडणुकीत एकाही बूथवर पुनर्मतदान झाले नाही. मागील १५ वर्षांत राज्यात झालेल्या बदलाचे हे प्रतिक आहे. राज्यात १९९५ मध्ये १ हजार ६६८ बूथवर पुनर्मतदान झाले होते. बिहारमध्ये १९९० ते २००४ या काळात लोकसभा, विधानसभा आणि पंचायत निवडणुकांमध्ये ६४१ जण मारले गेले होते.
लोक जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांच्या निधनानंतर बिहारमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगाने काढली आहे. या जागेवर भाजपने सुशीलकुमार मोदींना त्यांचा उमेदवारी दिली आहे. भाजपने एकाच वेळी मोदींचे पुनर्वसन आणि चिराग पासवान यांना झटका देण्याची चाल खेळली आहे. यामुळे पासवान यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 3 डिसेंबर आहे. या जागेसाठी 14 डिसेंबरला मतदान असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
भाजपने उपमुख्यमंत्रिपदी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांची निवड केली होती. सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री देण्यात आले नव्हते. याबद्दल मोदी यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. त्यांनी ट्विटरवर म्हटले होते आहे की, भाजप आणि संघ परिवाराने माझ्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दित दुसऱ्या कोणाकडून मिळणार नाही एवढे दान दिले आहे. यापुढेही पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती पार पाडू. माझे कार्यकर्ता पद तर कोणी काढून घेऊ शकत नाही.
Edited by Sanjay Jadhav

