उत्तर भारतातून गांधी परिवार दक्षिणेत..? राधाकृष्णन विरुद्ध प्रियांका गांधी लढतीची शक्यता

तमिळनाडूतील कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार उतरवला आहे. ही लढत लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.
bjp announces radhakrishnan candidature for kanyakumari lok sabha bypoll
bjp announces radhakrishnan candidature for kanyakumari lok sabha bypoll

नवी दिल्ली : तमिळनाडूतील कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघात 6 एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. भाजपने येथून माजी केंद्रीय मंत्री पॉन राधाकृष्णन यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेस नेते एच. वसंतकुमार यांचा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर ही जागा रिकामी झाली आहे. येथून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवावे, अशी मागणी काँग्रेसमधून होत आहे. त्यामुळे येथून काँग्रेस कुणाला मैदानात उतरवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. या बैठकीत राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तमिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुकने भाजपला विधानसभेच्या २० जागा दिल्या आहेत. याचबरोबर कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपने पदरात पाडून घेतली आहे. 

राधाकृष्णन हे कन्याकुमारीमधून 2014 मध्ये निवडून आले होते. त्यावेळी त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. ते अर्थ व जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री होते. नंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र, काँग्रेच्या वसंतकुमार यांनी राधाकृष्णन यांचा पराभव केला होता. राधाकृष्णन हे आधी भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्षही होते. 

कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वसंतकुमार यांनी दोन लाखांच्या मताधिक्याने 2019 ची निवडणूक जिंकली होती. याच मतदारसंघातून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींना उमेदवारी देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम ही मागणी केली आहे. त्यांनी पक्षाच्या राज्य निवडणूक समितीकडे याबाबतचा अर्ज दिला आहे. त्यामध्ये त्यांनी प्रियांका गांधी यांना कन्याकुमारी मतदारसंघातून उमेदवारी देण्याची विनंती केली आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आता काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठीसह वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढविली. पण अमेठी मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला. वायनाडमध्ये निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकाही केली होती. अमेठीमध्ये पराभव निश्चित असल्याने पळ काढल्याची टीका त्यांच्यावर झाली होती. गांधी कुटूंबाचा गड समजल्या जाणाऱ्या अमेठीतच राहुल गांधींचा पराभव झाला. वायनाडमधील मतदारांनी मात्र त्यांना स्वीकारले.

तमिळनाडू, पुद्दुच्चेरी व केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी नुकताच तिन्ही राज्यांचा दौरा केला आहे. या वेळी त्यांनी उत्तरेकडील राज्यांमधील राजकारणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. राहुल गांधींकडून उत्तर आणि दक्षिण असा वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यातच आता प्रियांका गांधी यांनाही दक्षिणेत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी या उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. रायबरेलीसह अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. पण भाजपने अमेठीवर कब्जा करत गांधींच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला होता. आता गांधी परिवाराची पावले दक्षिणेकडे वळतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com