मोठी बातमी : बिहारमध्ये अखेर ठरलं...भाजप-जेडीयू समसमान जागा लढवणार

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. एनडीएतून लोक जनशक्ती पक्ष बाहेर पडला आहे. आता भाजप आणि जेडीयूने अखेरीस जागावाटप जाहीर केले आहे.
bjp and jdu seat sharing finalised for bihar assembly election
bjp and jdu seat sharing finalised for bihar assembly election

नवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि  भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) एनडीएतून बाहेर पडला आहे. एलजेपीमुळे रखडलेले एनडीएचे जागावाटप अखेर जाहीर झाले असून, भाजप आणि जेडीयूने समसमान जागावाटप  केले आहे. 

यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीवेळी सहकारी असलेले पक्ष आता विरोधात मैदानात आहेत. मागील वेळी लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जेडीयू आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र होते. त्यावेळी भाजपने एलजेपी, राष्ट्रीय लोकसमता पक्षासोबत आघाडी केली होती. मागील निवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाघाडीचा  विजय झाला होता. या विजयानंतर काही महिन्यांमध्येच नितीश यांनी लालूंच्या पक्षाची साथ सोडत भाजपसोबत आघाडी केली होती. यामुळे विरोधी बाकांवरील भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष सत्तेत आला होता. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. आधी या महाआघाडीचे घटक असलेले जितनराम मांझी आता एनडीएमध्ये गेले आहेत. याचवेळी एनडीएमधील एलजेपीने वाढीव जागा मिळाव्यात म्हणून आग्रह धरला होता. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी जास्त जागा मिळाव्यात म्हणून आग्रही भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे एनडीएचे जागावाटप लांबले होते. 

या पार्श्वभूमीवर एलजेपीच्या नेत्यांची बैठक काल पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रामविलास पासवान या वेळी उपस्थित राहू शकले नव्हते. या बैठकीनंतर पक्षाने निवेदन जाहीर केले होते. यात म्हटले होते की, राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत आमची भक्कम आघाडी आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर आमचे जेडीयूसोबत वैचारिक मतभेद आहेत. यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीनंतर आमचे विजयी उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गावर भाजपसोबत असतील. 

चिराग पासवान यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एनडीएतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. भाजप आणि जेडीयूने 122-121 असे जागावाटप केले आहे. दोन्ही पक्षांना त्यांच्या कोट्यातील काही जागा सहकारी पक्षांना द्याव्या लागणार आहेत. सहकारी पक्षांना नेमक्या किती जागा मिळणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले  नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com