म्हणून खडसे-महाजनांचा वाद नात्यापर्यंत गेला; पक्षांतर्गत मतभेद ते कट्टर विरोधक...

Eknath Khadse, Girish Mahajan News : एकाच राजकीय मुशीत तयार झालेले दोन्ही नेते आज वेगवेगळ्या पक्षात एकमेकावर आरोप करीत आहेत.
Eknath Khadse, Girish Mahajan
Eknath Khadse, Girish MahajanSarkarnama

Eknath Khadse, Girish Mahajan News : 'एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की, खून झाला'? असा आरोप भाजप नेते व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केला, अन्‌ राज्यात एकच खळबळ उडाली. त्यावर बोलतांना मंत्री महाजन म्हणाले, त्यांनी मला मुलगा नसल्याचा आरोप केल्यामुळे आपण त्यांच्यावर आरोप केला. एकाच राजकीय मुशीत तयार झालेले दोन्ही नेते आज वेगवेगळ्या पक्षात एकमेकावर आरोप करीत आहेत. राजकीय वर्चस्वासाठी त्यांचे भांडण असले तरी तो थेट दोघांच्या नात्यापर्यंत गेल्याने घसरलेल्या राजकीय स्तराबाबत आता खुलेपणाने नाराजी व्यक्त होत आहे. 'नेतृत्व की संघर्ष में रिश्‍तों को क्यू बदनाम करें?' याचे भानही या नेत्यांना राहिलेले नाही.

'खानदेशची ही माती.. मातीतून निघती मोती' असे गीत आहे.. खरच या खानदेशच्या मातीने बहिणाबाई चौधरी, साने गुरूजी, बालकवी ठोंबरे यांच्यासारखे मोठे साहित्यरत्न दिलेत.. तर राजकीय क्षेत्रातही उत्तमराव पाटील, मधुकरराव चौधरी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासारखे नेतेही दिले आहेत. खानदेशचे मुख्य पीक कापूस आणि केळी आहेत, कापसाप्रमाणे मऊ अशी येथील माणसांची मने आहेत, तर केळीप्रमाणे गोड अशी खानदेशी वाणी आहे. खानदेशातील जळगाव जिल्हा हा महत्त्वाचा जिल्हा आहे, या ठिकाणी राजकीय क्षेत्रातूनच सहकाराची जोपासणा झाली.

याच सहकाराच्या बळावर जिल्ह्याचा एकेकाळी विकास झाला. राजकीय क्षेत्र वेगळे असले तरी सहकारात मात्र एकत्र येवून येथील राजकारणी काम करीत असतात आजही ही स्थिती कायम आहे. मात्र, खडसे व महाजन या दोन्ही नेत्यांनी एकमेकावर केलेल्या घरच्या नात्यापर्यंतच्या आरोपामुळे जिल्ह्यातील राजकीय स्थितीबाबत व्यक्त केली जात असलेली चिंता योग्य आहे.

Eknath Khadse, Girish Mahajan
आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले; अजित पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले...

एकनाथ खडसे (Eknath Khadse) व गिरीश महाजन हे एकाच राजकीय मुशीतून तयार झालेले नेते.. दोघांनीही भारतीय जनता पक्षात हातात हात घालून कार्य केलेय, आंदोलने करत पक्ष वाढविला आहे. मात्र, दोघे आज वेगवेगळ्या पक्षात आहेत, त्यामुळे त्यांचा विरोध असणे स्वाभाविकच आहे. परंतु, एका पक्षात असतांनाही अंतर्गत स्पर्धेतून एकनाथ खडसेंमुळेच भाजपत आपल्याला नेतृत्वाचा अधिक वाव मिळाला नाही, अशी खंत गिरीश महाजनांच्या मनात खडसे पक्षात असतांनाही होतीच.. त्यामुळे एकाच पक्षातही त्यांची अतंर्गत धुसफूस सुरूच होती. तर महाजनांचे नेतृत्व मोठे होवू नये यासाठी खडसे यांनी वेळोवेळी त्यांच्या कामात खोडा घातल्याचे भाजपमधूनच बोलले जात होते.

गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीही खडसे यांच्या कन्येला विधानसभेत पाडण्यासाठी अंतर्गत विरोधकांना मदत केली असा आरोप होत आहे. तसेच खडसे यांचे मंत्रिपद जाण्यातही गिरीश महाजन यांनीच अधिक रसद पुरविल्याचा आरोप होत होता. त्यामुळे दोघामध्ये राजकीय वर्चस्वाचा अंतर्गत संघर्ष पक्षातही सुरूच होता. मात्र, तो उघडपणे बाहेर येत नव्हता. मात्र, दोघांचे कार्यकर्ते त्याबाबत चर्चा करीत होते.

Eknath Khadse, Girish Mahajan
राज्यपालांना वृद्धाश्रमात पाठवा; अन्यथा महाराष्ट्र बंद आंदोलन : ठाकरेंचा इशारा

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला, आणि जिल्ह्यात भाजपच्या नेतृत्वाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे आली. त्यामुळे खऱ्या अर्थाने दोघांची जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी लढाई सुरू झाली. दोघांमध्ये अंतर्गत वाद होताच तो आता उघडपणे बाहेर पडू लागला. दोघेही एकमेकांवर उघडपणे आरोप करू लागलेत. एकनाथ खडसे यांनी महाजनांची सीडी आपल्याकडे असल्याचे जाहिरपणे सांगितले, त्यामुळे त्याबाबत राज्यभर चर्चा सुरू झाली. त्यानंतर महाजनांनीही खडसेंवर हल्ले सुरूच ठेवले.

महाविकास आघाडीचे सरकार असताना गिरीश महाजन यांच्यावर एकाला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला, त्यातून त्यांच्यावर 'मोक्का' लावण्याची कारवाई सुरू झाली, ही कारवाई खडसे यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा आरोप महाजनांनी केला, पुढे या प्रकरणातील सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांच्या संभाषणाचा पेनड्राईव्ह विधिमंडळात सादर करून देवेंद्र फडणवीस यांनी हा महाजन यांना फसविण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता. मात्र, या प्रकरणामुळे खडसे व महाजन यांच्यात अधिकच वितुष्ट निर्माण झाले.

Eknath Khadse, Girish Mahajan
माझं बोलणं झाल्यावर राहुल गांधींनी 'तो' मुद्दा टाळला; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले...

दोघांमधील वाद आणि जिल्ह्याचे राजकीय वर्चस्व सिध्द करण्यासाठी असलेली स्पर्धा यातूनही दोघांचे एकमेकावर जोरदार आरोप सुरू झाले आहेत. त्यात आता जिल्हा दूध संघाच्या होत असलेल्या निवडणुकीत आपले वर्चस्व दाखविण्याचीही खेळी आहेच. परंतु, यातून आता दोन्ही नेत्यांनी थेट एकमेकाच्या मुलापर्यंत आरोप केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. निवडणुकीत जनता दोघांच्या नेतृत्वाचा फैसला करेलच...परंतु दोघांनीही एकमेकावर आरोप करतांना निदान घरच्या नात्यापर्यंत तरी पोहचू नये, अशी जनतेतून अपेक्षा व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com