ओवेसी म्हणतात, हा तर काव्यगत न्याय झाला...

काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक वादळी ठरली असून, पक्षाच्या अध्यक्षपदाचा मुद्दा सोडून इतर मुद्द्यावरुनच ही बैठक गाजली आहे. आता यात असदुद्दीन ओवेसी यांनी उडी घेतली आहे.
aimim chief asduddin owaisi targets congress leader ghulam nabi azad
aimim chief asduddin owaisi targets congress leader ghulam nabi azad

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक आज अपेक्षेप्रमाणे वादळी ठरली. बैठकीतील इतर विषयांपेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित विधानावरुन मोठा गदारोळ उडाला. राहुल गांधी असे काही बोललेच नसल्याचा खुलासा पक्षाने केला आहे. काँग्रेसमधील वादात आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उडी घेतली आहे. त्यांनी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना लक्ष्य केले आहे. 

काँग्रेस कार्यकारी समितीची अतिशय महत्वाची बैठक आज झाली. काँग्रेसच्या वीसहून अधिक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली होती. याचबरोबर त्यांनी पक्षातील रचनात्मक सुधारणांचा मुद्दा उपस्थित करुन पक्षाची स्थिती आणि दिशा याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याचबरोबर त्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीची निवडणूक घेण्याची मागणी केली होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या व्हर्च्युअल बैठकीला सोनिया गांधी, डॉ.मनमोहनसिंग, राहुल गांधी, प्रियांका गांधी वद्रा, अमरिंदरसिंग, मल्लिकार्जुन खर्गे, पी.एल.पुनिया, के.सी.वेणूगोपाल आणि ए.के.अँटनी यासह अन्य नेते या बैठकीला उपस्थित होते. आजच्या बैठकीत हंगामी अध्यक्षपदावरुन मुक्त करण्याची विनंती सोनिया गांधी यांनी समितीच्या सदस्यांनी केली. यावर मनमोहनसिंग आणि ए.के.अँटनी यांनी नवीन अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया यांनीच अध्यक्षपदी राहावे, असे सुचवले.

काँग्रेस नेत्यांच्या पत्राच्या मुद्द्यावरुन पक्षात दोन गट पडले आहेत. गांधी कुटुंबाचे निष्ठावंत आणि काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. सोनिया यांनीच अध्यक्षपदी राहावे अथवा राहुल यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोनिया गांधी यांनी 10 ऑगस्ट 2019 रोजी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. 

पक्षातील नेतृत्व बदलाबाबत पत्र लिहिणारे नेते हे भाजपशी संगनमत करीत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी या बैठकीत केल्याची चर्चा सुरू झाली होती. राजस्थानमध्ये पक्षासमोर निर्माण झालेले संकट, सोनिया गांधी रुग्णालयात दाखल असतानाची नेमकी वेळ पत्रासाठी निवडण्यात आली, असे राहुल गांधी म्हणाल्याचीही चर्चा होती. अखेर पक्षाने राहुल गांधी असे काहीच बोलले नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

सिब्बल यांच्या ट्विटवरुन मोठा गदारोळ उडाल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वत: सिब्बल यांच्याशी चर्चा केली. यानंतर सिब्बल यांनी अखेर ट्विट मागे घेतले. याचबरोबर सिब्बल यांनी जाहीर खुलासा करुन या मागील कारण स्पष्ट केले. आजच्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीला गुलाम नबी आझाद उपस्थित होते. राहुल गांधी यांनी असे विधान केल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ, अशी भूमिका गुलाम नबी आझाद यांनी घेतली आहे.  

या वादात आता असदुद्दीन ओवेसी यांनी उडी घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा तर काव्यगत न्याय झाला आहे. गुलाम नबी आझाद आधी माझ्यावर जो आरोप करीत होते आता तोच त्यांच्यावर होऊ लागला आहे. तुम्ही 45 वर्षे यासाठीच गुलामी केली का? जानवेधारी नेतृत्वाला विरोध करणाऱ्यांना भाजपची बी-टीम म्हणून हिणवले जात असल्याचे आता सिद्ध झाले आहेत. आता मुस्लिमांनाही त्यांच्या काँग्रेस निष्ठेची किंमत कळाली असेल. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com