नेत्याचे अश्रू पाहिले अन् उसळला हजारोंचा जनसमुदाय..!

कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात सरकारची दडपशाही सुरू असल्याचा आरोप होत आहे. या विरोधात आयोजित किसान महापंचायतीत आज मोठा जनसमुदाय उसळला.
after video of rakesh tikait crying goes viral big crowd at mahapanchayat
after video of rakesh tikait crying goes viral big crowd at mahapanchayat

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी दोन महिन्यांपासून अधिक काळ दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत आहेत. सरकारकडून आता शेतकऱ्यांची दडपशाही करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यामुळे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत भावनिक झाले होते. टिकैत हे भावनिक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, आपल्या नेत्याचे अश्रू पाहून हजारोंचा जनसमुदाय आज मुझफ्फरनगरमध्ये उसळला. 

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळे खाली करावीत, यासाठी सरकारने दबाव आणण्यास सुरवात केली आहे. पोलिसांच्याकडूनही शेतकऱ्यांना इशारा दिला जात आहेत. गाजीपूर सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे. यानंतर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सरकारकडून शेतकऱ्यांचा छळ सुरू असल्याचा आरोप केला. 

शेतकऱ्यांसमोर बोलताना टिकैत यांना अश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे. शेतकऱ्यांना ठार मारण्याचा कट आखला जात आहे. सरकारने कायदे मागे न घेतल्यास मी आत्महत्या करेन. या देशातील शेतकऱ्यांनी मी वाया जाऊ देणार नाही. 

टिकैत यांनी गाझीपूर सीमेपासून 150 किलोमीटर अंतरावर मुझफ्फरगनर येथे किसान महापंचायत बोलावली होती. त्याआधीच टिकैत हे भावनिक झाल्याचा व्हिडीओ समोर आला. आपल्या नेत्याचे अश्रू पाहून त्यांचे हजारो समर्थक आज मुझफ्फरनगरमध्ये जमले. 

महापंचायतीला मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर मोठ्या प्रमाणात शेतकरी गाझीपूर सीमेवर पुन्हा आंदोलनात सहभागी होऊ लागले आहेत. 

अतिशय मोठा कट रचण्यात आला आहे, मला याबद्दल माहिती नव्हते. मी सगळ्या लोकांच्या विरोधात जाऊन भाजपला मतदान केले होते. माझ्या पत्नीनेही दुसऱ्या पक्षाला मतदान केले होते. मी भाजपला मतदान करुन आपल्याच लोकांचा विश्वासघात केला. देशातील शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र या सरकारकडून सुरू आहे, असे टिकैत यांनी म्हटले आहे. 

कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी ट्रॅक्‍टर रॅलीला परवानगी देताना शेतकरी नेत्यांनी दिलेले लेखी आश्‍वासन पाळले नाही व त्यामुळे दिल्लीत हिंसाचार उफाळला व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले, असा आरोप शेतकरी नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com