नवी दिल्ली : देशातील कोरोना (Corona) रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, मृत्यूचे आकडे आता विक्रमी पातळीवर पोचले आहेत. यातच आता एका नव्या आजाराने थैमान घालण्यास सुरवात केली आहे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना हा आजार लक्ष्य करु लागला आहे. या काळी बुरशी (Black Fungus) आजारामुळे गुजरात राज्यात सुरतमध्ये आठ नागरिकांना डोळे गमावावे लागले आहेत. (after covid recovery mucormycosis infection found in patients)
या आजाराचे नाव म्युकोरमायकॉसिस असे असून, तो केवळ कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. म्हणजेच कोरोनातून बचावलेल्या रुग्णांसमोर आणखी भयानक आजाराचे संकट उभे राहिले आहे. सुरतमध्ये या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. मागील 15 दिवसांत सुमारे 40 पेक्षा अधिक जणांना हा आजार झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 8 जणांनी त्यांची दृष्टी गमावली आहे.
या आजारावर वेळीच उपचार झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. परंतु, उपचार न झाल्यास अथवा उपचारास विलंब झाल्यास रुग्ण डोळे गमावून बसतो. यात रुग्णाचा जीव जाण्याचीही शक्यता असते. हा आजार म्हणजे अतिशय दुर्मिळ असा बुरशीजन्य संसर्ग आहे. याचा प्रामुख्याने मानवाच्या शरीरातील सायनस आणि फुफ्फुसे यांच्यावर परिणाम होते. हवेतून तो शरीरात जातो. याचबरोबर शरीरावरील जखमातूनही त्याच्या शरीरात त्याचा प्रवेश होतो.
कोरोनातून बरे झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी म्युकोरमायकॉसिसची लक्षणे दिसण्यास सुरवात होतात. पहिल्यांदा सायनस आणि त्यानंतर दोन ते चार दिवसांत डोळ्यांवर परिणाम होतो. पुढील 24 तासांत ते मेंदूपर्यत पोचलो, अशी माहिती तज्ञांनी दिली.
कोरोनामुळे देशात 24 तासांत 4 हजार 187 मृत्यू
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 18 लाख 92 हजार 676 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 38 हजार 270 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 4 लाख 1 हजार 78 रुग्ण सापडले आहेत. मागील 24 तासांत 4 हजार 187 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 37 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 37 लाख 23 हजार 446 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 17.01 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 81.90 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 79 लाख 30 हजार 960 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.09 टक्के आहे.
देशातील राज्यनिहाय 24 तासांतील मृत्यू (एकूण मृत्यू 2,38,270)
महाराष्ट्र : 898
कर्नाटक : 592
उत्तर प्रदेश : 372
दिल्ली : 341
छत्तीसगड : 208
तमिळनाडू : 197
पंजाब : 165
राजस्थान : 164
हरियाना : 162
उत्तराखंड : 137
झारखंड : 136
गुजरात : 119
पश्चिम बंगाल : 112
देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे
20 लाख : 7 ऑगस्ट (2020)
30 लाख : 23 ऑगस्ट
40 लाख : 5 सप्टेंबर
50 लाख : 16 सप्टेंबर
60 लाख : 28 सप्टेंबर
70 लाख : 11 ऑक्टोबर
80 लाख : 29 ऑक्टोबर
90 लाख : 20 नोव्हेंबर
1 कोटी : 19 डिसेंबर
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)
2 कोटी : 4 मे
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.