मी पुढील 20 वर्षे कोणतेही मंत्रिपद स्वीकारणार नाही; अभिषेक बॅनर्जींची प्रतिज्ञा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे असलेले अभिषेक यांना वारसदार ठरवण्यात आले आहे.
abhishek banerjee says he will not accept any ministerial post for 20 years
abhishek banerjee says he will not accept any ministerial post for 20 years

कोलकता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे भाचे अभिषेक बॅनर्जींना (Abhishek Banerjee) वारसदार ठरवण्यात आले आहे. यावरुन टीका होऊ लागल्याने अभिषेक बॅनर्जींनी टीकाकारांना थेट उत्तर दिले आहे. पुढील 20 वर्षे कोणतेही मंत्रिपद स्वीकारणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली असून, सर्वच विरोधकांची तोंडे बंद केली आहे. 

तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर घराणेशाहीचा आरोप भाजपने विधानसभा निवडणुकीत केला होता. पंतप्रधान मोदींसह भाजपच्या सर्वच नेत्यांनी प्रचारात अभिषेक बॅनर्जींच्या मुद्द्यावरुन ममतांना लक्ष्य केले होते. आता ममतांनी अभिषेक यांना वारसदार ठरवले आहे. यामुळे पुन्हा एकदा मोठा गदारोळ उडाला असून, विरोधकांनी ममतांवर हल्लाबोल केला आहे. 

याला उत्तर देताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, काही वेळा घराणेशाही ही घाणेरड्या राजकारणापेक्षा चांगली असते. एकाच घरातील एकच व्यक्ती राजकारणात असावी असे विधेयक संसदेत मांडण्यात आल्यास मी तातडीने राजीनामा देईन. पुढील 20 वर्षे मी कोणतेही सार्वजनिक पद अथवा मंत्रिपद स्वीकारणार नाही. मी केवळ पक्षाच्या विकासाठी काम करीत राहीन. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने आधी अमित शहांचा पुत्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर आहे ही बाब लक्षात घ्यावी. भाजप नेत्यांची मुले सार्वजनिक पदावर असून, त्यांचा आधी राजीनामा घ्या. 

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनाही अभिषेक यांनी लक्ष्य केले. ते म्हणाले की, मालवीय यांनी टॅक्सी करुन दिल्लीतील लुटेयन्स भागातील त्यांच्या बॉसकडे जावे. एका घरातील एकच व्यक्ती राजकारणात असावा, असे विधेयक संसदेत आणण्यास त्यांनी त्यांच्या बॉसला सांगावे. तुमच्याकडे बहुमत आहे तर आणा हे विधेयक. हे विधेयक संमत झाल्यास राजीनामा देणारा मी पहिला व्यक्ती असेन. 

तृणमूल काँग्रेसची महत्वाची बैठक नुकतीच. या व्हर्च्युअल बैठकीला पक्षाचे आमदारही उपस्थित होते. निवडणूक निकालानंतर आमदारांची ही पहिलीच बैठक झाली. या बैठकीला ममतांचे रणनीतीकार प्रशांत किशोर हे सुद्धा उपस्थित होते. याच बैठकीत अभिषेक बॅनर्जी यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यावर शिक्कामोर्तब झाले. याचबरोबर पक्षाच्या युवा विभागाच्या अध्यक्षपदी अभिनेत्री सयोनी घोष यांची निवड करण्यात आली. याचवेळी कुणाल घोष यांची राज्य सरचिटणीसपदी निवड झाली. 

अभिषेक यांच्याकडे पक्षाच्या युवा विभागाचे अध्यक्षपद होते. त्यांनी या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाली. तृणमूलमध्ये एक नेता एक पद असे धोरण आहे. यानुसार त्यांनी युवा विभागाची जबाबदारी सोडली. त्यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी ममतांनी सोपवली. या घडामोडीमुळे ममतांचा वारसदार कोण, या प्रश्नाला अखेर उत्तर मिळाले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगले होते. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 213 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. या वेळी 77 जागांसह भाजप प्रमुख विरोधी पक्ष बनला. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी सत्ता स्थापन केली. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com