दुर्दैवी : तळीयेत 31 जण सापडलेच नाहीत, शोधकार्य थांबवलं

मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागात दाणादाण उडवली आहे.
31 missing people to be declared dead in Taliye village
31 missing people to be declared dead in Taliye village

रायगड : जिल्ह्यातील तळीये या गावांवर आभाळ फाटलं अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. डोंगउतारावर वसलेल्या या गावावर पाच दिवसांपूर्वी दरड कोसळली. सायंकाळची वेळ असल्यानं अनेक जण घराबाहेर होते. पण घरात अडकलेल्या बहुतेकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. चार दिवस दरडीखाली दबलेल्या लोकांचा शोध घेतला जात होता. यातून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले पण अखेरपर्यंत 31 जण सापडलेच नाहीत. त्यामुळं शोधकार्य थांबवत त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यामुळे मृतांचा आकडा 84 वर पोहचला. (31 missing people to be declared dead in Taliye village)

मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागात दाणादाण उडवली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात (Talai Village) ही भीषण दुर्घटना घडली आहे. तुफान पावसामुळे घरांवर दरड कोसळली असून सुरूवातीलाच 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ यांच्याकडून शोधमोहिम हाती घेण्यात आली.

शोधमोहिमेतून 53 मृतदेह हाती लागले. पण आणखी काही जण बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरूच होता. अखेर शोध घेणाऱ्या यंत्रणांशी चर्चा करून सोमवारी (ता. 26) शोध थांबवण्यात आला. त्यामुळं मृतदेह न सापडलेल्या 31 जणांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या घटनेत पाच जण जखणी झाले आहेत. 

राज्यात 180 जणांचा मृत्यू

राज्यात मागील आठवड्यात दरडी कोसळून व पुरामुळे 180 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 91 जण रायगड जिल्ह्यात मृत पावले आहेत. त्यानंतर सातारा जिल्ह्यात 41 जणांचा, रत्नागिरी 21, ठाणे 12, कोल्हापूर 7, मुंबई 4, पुणे व सिंधुदूर्ग जिल्ह्यात प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 3 हजार 248 जनावरंही दगावली आहे. सुमारे 17 हजार 300 कोंबड्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली. जवळपास 30 अजूनही बेपत्ता असून 50 ते 55 जण जखमी झाले आहेत. 

राज्याच्या अनेक नद्यांना पुर आल्याने रविवारी सायंकाळपर्यंत सुमारे 2 लाख 30 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. सर्वाधिक 1 लाख 70 हजार नागरिक सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर कोल्हापूर मधील 40 हजार 882, सातारा 7530, ठाणे 6930, रत्नागिरी 1200, रायगड 1000, सिंधुदूर्ग 1271 आणि पुणे जिल्ह्यातील 263 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com