
Congress News : येत्या फेब्रुवारी महिन्यात कॉंग्रेसचे (Congress) तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन रायपूरला होत आहे. या अधिवेशनाआधी पक्षाची संघटनात्मक बांधणी होणार आहे. अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत. राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनाही बदलण्यात येऊ शकते. पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदाला पुढच्या महिन्यात दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे पटोलेंना खरोखरच बदलायचे झाले तर त्यांच्या जागी सुनील केदार, यशोमती ठाकूर व संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्याआधी बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या जागी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदाला पुढच्या महिन्यात दोन वर्षे पूर्ण होत आहेत. पक्षाच्या घटनेनुसार त्यांची मुदत संपलेली नाही. मात्र, नजिकच्या काळात होणाऱ्या पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महापालिका, लोकसभा व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा अशी निवडणुकांची मालिका आहे. या काळात नव्या चेहऱ्याकडे पक्षाचे प्रदेश नेतृत्व दिले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. ही शक्यता प्रत्यक्षात आली तर यशोमती ठाकूर, सुनील केदार व संग्राम थोपटे ही तीन नावे आघाडीवर आहेत.
सुनील केदार (Sunil Kedar) हे विदर्भातील दमदार नेतृत्व मानले जाते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे क्रिडा खात्याचे मंत्रीपद होते. विदर्भातील तरूण आणि दमदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विदर्भात कॉंग्रेस टिकवून ठेवण्यात केदार घराण्याचे मोठे योगदान आहे. शिवाय पटोले यांना बदलायचे झाल्यास केदार यांच्या रूपाने विदर्भाकडेच कॉंग्रेस नेतृत्व राहू शकते. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पटोले यांच्याइतकाच केदार यांचाही संपर्क असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे केदार हे मोठे दावेदार मानले जात आहेत.
यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यादेखील विदर्भातील अमरावतीच्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या महिला, बालविकास व कुटुंब कल्याण विभागाच्या मंत्री होत्या. पक्षातील तरूण महिला नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राहुल गांधी यांच्या कोअर टीममधील तरूण नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. यापुढच्या काळात तरूणांकडे पक्षाचे नेतृत्व द्यायची पक्षाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात तसे झाल्यास महिला म्हणून ठाकूर यांच्याकडे नेतृत्व येऊ शकते.
आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) हे या स्पर्धेतील आणखी एक महत्वाचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदार संघातून सलग चारवेळा ते निवडून आले आहेत. आमदार थोपटे यांना याआधी मंत्रीपदाबरोबरच विधानसभा अध्यक्षपदाने हुलकावणी दिली आहे. मंत्रीपद व विधानसभा अध्यक्षपद मिळण्याच्यावेळी पक्षाने आमदार थोपटे यांना डावलले आहे. आता प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत आहे. ही तिसरी संधी आमदार थोपटे यांना मिळणार की ही संधीदेखील हुलकावणी देणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.